सीमाभागाचा वाद केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच
मुंबई,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सीमाप्रश्नी बेळगावात येऊ नका असा इशारा दिल्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांचा उद्या (दि.६) ठरलेला बेळगाव दौरा आता रद्द करण्यात आला आहे. यामुळे आता महाराष्ट्र सरकारवर जोरदार टिका होत आहे.
हा दौरा का रद्द केला याबाबत बोलताना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“सर्वोच्च न्यायालयात सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत महाराष्ट्र किंवा कर्नाटक निर्णय घेऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालायच याबाबत निर्णय घेईल. त्यामुळे विनाकारण नव्याने वाद तयार करणे योग्य नाही. महाराष्ट्राने अतिशय ताकदीने बाजू मांडली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आमचा विश्वास आहे.”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ” महाराष्ट्रातील मंत्री महापरिनिर्वाण दिनानिमित्त कर्नाटकात जाणार होते. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या सीमावाद आहे. अशावेळी तेथील संभाव्य वाद टाळावा याकरीता दौरा रद्द होऊ शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील”