राष्ट्रीय सुरक्षा दिन : आपल्या सुरक्षेसाठी आपणच सजग आणि आग्रही असायला हवे.

 राष्ट्रीय सुरक्षा दिन : आपल्या सुरक्षेसाठी आपणच सजग आणि आग्रही असायला हवे.

राधिका अघोर

भारतात चार मार्च १९७२ साली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली. ह्या दिनाचे औचित्य साधत हा दिवस, राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. समाजात, विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना, श्रमिकांना सुरक्षा देण्याचा विचार रुजावा, आणि त्यासाठी जागृती केली जावी, ह्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. आता त्याची व्याप्ती वाढली असून, कार्यस्थळ, रस्ते, घर, आणि एकंदर इतर ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी जबाबदारीची जाणीव करून दिली जाते.

भारतासारख्या गरीब आणि विकसनशील देशात, रोजगार मिळवण्यासाठी अनेकदा श्रमिक धोक्याची कामे करायला तयार होतात. मोठे उद्योजक, भांडवलदार अशा श्रमिकांच्या जीवाची आणि इतर सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेत नाहीत, असंही आढळलं आहे. एकूणच, भारतात रस्ते अपघात, इतर औद्योगिक ठिकाणी होणारे अपघात, घरात होणारे अपघात, यांची कारणं आणि प्रमाण लक्षात घेतलं तर, सुरक्षेच्या बाबतीत आपण अत्यंत निष्काळजी आणि उदासीन असल्याचं दिसतं. म्हणूनच ह्या क्षेत्रात अधिकाधिक जनजागृती आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. खरं तर सुरक्षित वातावरणासाठी, तशी कार्यसंस्कृतीच विकसित व्हायला हवी.

औद्योगिक सुरक्षा-म्हणजेच कारखाने आणि उद्योग क्षेत्रातील कामगारांना सुरक्षा पुरवणे, रस्ते अपघात कमी करण्यासाठी नियमांचं पालन, योग्य तपासणी नंतरच पात्र लोकांना वाहन परवाना देणे, वाहन सुरक्षितता असे घटक समाविष्ट आहेत. तर घरगुती पातळीवर गॅस सिलेंडरचे स्फोट, विजेचे धक्के, स्वयंपाक घरात आग लागणे अशा अनेक प्रकारचे अपघात होतात.

अलिकडच्या काळात आणखी एका क्षेत्रात सुरक्षितता पाळणे आवश्यक झाले आहे, ते म्हणजे सायबर सुरक्षा. इंटरनेट च्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत.
अशा सगळ्या सुरक्षिततेच्या क्षेत्रात, सरकारने अनेक नियम कायदे बनवले आहेत. त्याबद्दल वेळोवेळी जनजागृती ही केली जाते.

कारखाना अधिनियम, 1948 श्रमिक, कामगारांच्या सुरक्षेसाठी आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 रस्ते वाहतूक सुरक्षेविषयी आहे, तर पर्यावरण संरक्षण, आग आणि स्फोटक पदार्थ अधिनियम
नव्यानेच आलेला सायबर सुरक्षा कायदा, असे सगळे कायदे तर आहेतच. पण कायदे किंवा जनजागृती यापेक्षाही आपली सुरक्षा आपल्यालाच बघावी लागते, हेच खरं आणि महत्वाचं आहे. आपल्या दैनंदिन कामात स्वतःला आणि इतरांनाही काही अपघात होणार नाही, याची काळजी घेणे, कामे नीट करणे, वाहन सुरक्षित रित्या चालवणे, कुठलेही वाहन किंवा उपकरण हाताळताना ते व्यवस्थित सुस्थितीत आहे, याची काळजी घेणे, अशा उपाययोजना कराव्या लागतात.

हा राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 ते 10 मार्च पाळला जातो, या कालावधीत सुरक्षाविषयक जनजागृती, विविध उपाययोजना केली जाते. प्रशिक्षण दिलं जातं. सुरक्षाविषयक उपकरणे आहेत की नाही याची खातरजमा केली जाते. विशेषतः छोट्या खाजगी कार्यालयांची तपासणी करून तिथे सुरक्षाविषयक उपकरणे आहेत की नाही, अपघात झाल्यास सुरक्षेची व्यवस्था आहे की नाही, याची वेळोवेळी तपासणी केली जाते.

आपल्या देशात, एखादा अपघात, विशेषतः खूप मोठी जीवितहानी झाली तरच त्या त्या ठिकाणच्या सुरक्षेबद्दल बोललं जातं, चर्चा होते, न्यायालय आदेश देते, प्रशासन काहीतरी उपाययोजना करते. पण हे सगळे तात्पुरते आणि अपघात झाल्यावर होते. एरवी, सगळा आनंदीआनंदच असतो. अशा घटना टाळण्यासाठी, जिवाचं मोल समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या क्षेत्रात भारताला अद्याप बरेच काम करणे आवश्यक आहे, आणि आपल्याला सजग होणे आवश्यक आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *