नारायण राणे यांची निवड रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क):
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी याबाबतची कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्या मार्फत पाठवलेली आहे.

निवडणुक प्रचार कालावधी 5 मे रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटिस मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायच आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली त्याचाही उल्लेख नोटिस मध्ये करण्यात आलेला आहे.
निवडणुक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाही ची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणुक आयोगने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिस मधून केलेली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने 7 दिवसात या नोटिस वर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणुन भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिति असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *