बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात सुधारणा…
मुंबई दि १८ : बिबट्यांना पकडणे त्यांच्यावर उपचार करणे किंवा त्यांचा स्थलांतर करणे यासाठी सध्या केंद्र सरकारच्या वन्यजीव मंडळाला असलेले अधिकार राज्याच्या वन्यजीव मंडळाकडे घेण्यासाठी कायद्यात बदल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले, यामुळे बिबट्यांना मारणे किंवा त्यांना धोका निर्माण करणे याला परवानगी मिळणार नाही असे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
राज्यात काही वर्षात बिबट्यांची संख्या चार पटीने वाढली आहे. त्यांचे मानवा वरील हल्ले वाढत आहेत. बिबटे हे आता केवळ जंगलात राहत नसून ते उसांच्या फडात राहत असून त्यांनी त्यांचा अधिवास बदलला आहे. अशा वाढलेल्या बिबट्यांपासून मानवाला होणारा धोका लक्षात घेता प्रत्येक वेळी त्यांना पकडणं, त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करणे यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार जाणं जिकिरीचं होत आहे. यामुळे हे काम सोपं व्हावं यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आहे, असं वनमंत्री गणेश नाईक यांनी हे विधेयक मांडताना स्पष्ट केलं. बिबट या प्राण्याला सूची एक मधून सूची दोन मध्ये आणण्यासाठी हे विधेयक नाही केवळ कायद्यात असणाऱ्या कलम 12 मध्ये ही सुधारणा आहे असेही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या विधेयकाला आधी राज्यपालांची आणि नंतर राष्ट्रपतींची मंजुरी घ्यावी लागेल असेही मंत्री यावेळी म्हणाले.ML/ML/MS