मुंडे यांच्या राजीनाम्याने महायुतीतील दरी वाढली…

 मुंडे यांच्या राजीनाम्याने महायुतीतील दरी वाढली…

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी थेट संबंध असल्याने गेले तीन महिने वादग्रस्त ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असून तो राज्यपालांनी स्वीकारला आहे.यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असे चित्र दिसत आहे.

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडले आणि त्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा केला, बाकी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी देखील वारंवार धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र काल या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात पोलिसांनी हस्तगत केलेली काही भीषण छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर मुंडे यांच्यावरील दबाव वाढला आणि आज त्यांनी राजीनामा दिला.

मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून तो राज्यपालांकडे पाठवल्याचे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले , सायंकाळी राज्यपालांनी तो स्वीकारल्याचे जाहीर केले मात्र हा राजीनामा नैतिकतेने दिल्याचे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले असतानाच दुसरीकडे मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत तो दिल्याचे स्पष्ट केले आणि पुन्हा ते वादग्रस्त ठरले आहेत.

मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी ही कृती आधीच व्हायला हवी होती असे सांगत आपल्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आपल्या भावाच्या विरोधात भावना व्यक्त केल्या आहेत. तिकडे शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने ही जागोजागी निदर्शने करून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या सगळ्यावरून अंतर्गत राजकारणाला ऊत येणार हे निश्चित झाले आहे.

ML/ML/SL

4 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *