भ्रष्ट महायुती सरकारने मुंबईची तुंबई केली

मुंबई, दि.26
मुंबईत दरवर्षी मान्सूनपूर्व कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात पण त्यातून कामे कशी होतात हे चित्र पहिल्याच पावसाने दाखवून दिले आहे. बीएमसीत प्रशासकाच्या माध्यमातून भाजपा युती सरकार राज्य करत असून पहिल्याच पावसात मुंबईकरांना जो नाहक त्रास सहन करावा लागला त्याला भ्रष्ट भाजपा युतीचे ट्रिपल इंजिन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सोमवारच्या पावसाने मुंबईतील धारावी, सायन, हिंदमाता, अंधेरी सबवे, चेंबूर या भागात पाणी साचले. रेल्वे ट्रॅक व भुयारी मेट्रो स्टेशनमध्येही पाणी साचून प्रशासनाची तयारी किती फोल आहे हे दिसले. बीएमसी प्रशासन व राज्य सरकारने केलेले सर्व दावे पावसात वाहून गेले आहेत. मुंबईत गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही. प्रशासकाच्या माध्यमातून बीएमसीचा कारभार सुरु असून या सरकारच्या बेलगाम भ्रष्टाचाराचे परिणाम आज मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. पहिल्याच पावसात मुंबईकर ना घरात सुरक्षित आहेत, ना रस्त्यावर, ना ट्रेनमध्ये, ना बसमध्ये आणि ना बहुचर्चित मेट्रोत, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मुंबई काँग्रेसची अध्यक्ष व खासदार नात्याने आम्ही दोन दिवसापूर्वीच शहरातील नालेसफाईची पाहणी केली होती, त्यावेळीच महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल केली होती. अनेक भागात गाळ काढण्याचे काम झालेले नाही. काही भागात गाळ काढून तसेच ढिग पडून आहेत. जे काम झाले आहे तेही व्यवस्थित झालेले नाही. मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून या भ्रष्टाचाराची एसीबी मार्फत चौकशी करावी या मागणीचा पुनरुच्चार खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. KK.MS