प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुल्लाबाग रहिवाशांनी मानले आभार

ठाणे दि १५– ठाणे- बोरिवली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आज 15 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांचे मुल्लाबाग येथील ठाणे-बोरिवली ट्विन टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशन तर्फे आभार मानत सत्कार केला.
ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने रहिवासी आणि एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली होती.
बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
भरगच्च भरलेल्या सभागृहात गेली अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती. आम्ही अडचणीत असताना नेहमीच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे आमच्या मदतीला धावून येतात. प्रश्न कोणताही असो ते नेहमीच योग्य आणि रहिवाशांच्या बाजूने तोडगा काढतात. विरोधी पक्षाच्या नेत्याने कितीही आवई उठवली, कितीही उर बडवून कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी येथील रहिवासी सुज्ञ आहे, अशी भावना यावेळी अनेक रहिवाशांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना खासदार नरेश म्हस्के यांनी हे श्रेय आमचे नसून जनतेच्या रेट्याचे असल्याचे सांगत हा लढा येथील रहिवाशी जिंकले आहेत. रहिवाशांचे अभिनंदन करत आम्ही सदैव रहिवाशांसोबत असल्याची ग्वाही खासदार म्हस्के यांनी दिली.
नितीन लांडगे, आशुतोष सिरोलकर, राकेश मोदी, सिद्धार्थ पांडे, गौतम दिघे, केतन खेडेकर, जयंत धाणे, सुनील भिडे, प्रसन्न मुजमदार, मदुरेश सिंग, नितीन सिंग, शरद वारस्कर, दीपक पांडे, पल्लवी सेठ, तारक मोदी, निवृत्ती गावंडे, दीपक मल्होत्रा, टोनी सिंग, प्रल्हाद बोरसे, नीता कलोरे पल्लवी शेट्ये, कल्पना वोरा आणि रहिवाशांचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर आभार मानले.ML/ML/MS