स्थानिकांचा विरोध डावलून कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीच्या घशात – खा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि 4
धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा सरकार मुंबईतील मोक्याचा जागा अदानीच्या घशात घालत आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीला देण्यास स्थानिक लोकांचा विरोध आहे. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत करायचे आहे तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनी अदानीला का दिल्या जात आहेत असा संतप्त सवाल करून मदर डेअरीची जागा अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा व कुर्ल्यातील नागरिकांचा विरोध यापुढेही कायम राहिल असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत आज कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीला देण्याचा निर्णय झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ही जागा अत्यंत मोक्याची आहे, या जागेवर शेकडो वृक्ष आहेत. पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाची जागा असून या जागेवर उद्यान व्हावे ही स्थानिकांची मागणी होती पण त्याला न जुमानता भाजपा सरकारने ही जागा अदानीला बहाल केली आहे. ही जागा देऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाने स्थानिकांसोबत आंदोलने केली पण सरकार मात्र अदानीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून पायघड्या घालत आहे. आता आणखी एक नवीन बनाव रचत राज्य मंत्रिमंडळानं अदानीच्या फायद्यासाठी या जमिनीच्या सब लीजिंगचीही मान्यता दिली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या स्थानिक आमदाराने मदर डेअरीची जागा अदानी देऊ देणार नाही असे जाहीर केले होते, मोठी जाहिरातबाजीही केली होती मग आता काय झाले, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. स्थानिकांचा विरोध असताना सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, पण हा लढा थांबणार नाही. यापुढेही धारावीच्या हक्कासाठी आमचा लढा सुरुच राहिल व संघर्ष यापुढे तीव्र असेल असा इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.