मुंबईत मान्सूनची तुफानी एन्ट्री, रेल्वे – विमान सेवा झाली ठप्प

मुंबई, दि. २६ : वेळेआधीच १२ दिवस महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने कालपासून राज्यभर तुफान बरसायला सुरुवात केली आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरात काल दुपारपासून वादळीवारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधारपाऊस सुरु आहेत. मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून २६ मेलाच २६ जुलैसारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील रेल्वे आणि विमान वाहतूकीलाही याचा मोठा फटका बसला आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही प्रमुख मार्गांवरील लोकल ट्रेन सेवा उशिराने धावत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सकाळी मुंबईसाठी इशारा जारी केला, ज्यामध्ये म्हटले आहे की, पुढील ३ ते ४ तासांत शहरातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, जोरदार पाऊस आणि ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार, उद्या २७ मे २०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजेपर्यंत मुंबईत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.