गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?

सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये एकदा का ‘पाणी कमी आहे किंवा कमी होण्याच्या बेतात आहे,’ असं लक्षात आलं, की सहाजिकच गर्भवती किंवा तिच्या नातेवाईकांकडून ‘काही काळजीचंच तर कारण नाही ना डॉक्टर?’ असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस गर्भ किती आठवड्याचा आहे यावर अवलंबून असतं. समजा ३७ आठवडे पूर्ण झालेल्या कालावधीत पाणी कमी झालंय असं लक्षात आल्यास कळा येण्याचं इंजेक्शन देऊन प्रसूती (induction of labour) नैसर्गिक मार्गाने व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. या प्रक्रियेत बाळाच्या हृदयाचे ठोक्यांची गती अनियमित होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून देखील ‘सिझेरियन’ करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. ‘सिझेरियन’चा निर्णय घेण्यासाठी आणखी काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. गर्भधारणेच्या कालावधीत बीपी वा रक्तदाब वाढल्यामुळे देखील गर्भजलाचं प्रमाण कमी होऊ शकतं. गर्भवतीचं बीपी वाढलं आहे आणि गर्भजलाचं प्रमाण कमी झालेलं असताना ‘सिझेरियन’ची शक्यता जास्त असते. गर्भजल कमी असल्यामुळे बाळाचं ‘फिरणं’ कमी होत असतं. अशा परिस्थितीत बाळ समजा ‘पायाळू’ आहे तर ते फिरून परत डोक्याकडून होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे देखील ‘सिझेरियन’ करावं लागतं.