नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक समीकरण

 नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक समीकरण

मुंबई दि १०– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असून देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल भातखळकर, आ. संजय कुटे, आ. सीमा हीरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील जनहिताच्या योजनांची संपूर्ण तपशीलवार माहितीच सादर केली. याच काळात देशातील विविध विकास योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासास गती मिळाली असून महाराष्ट्र मोदी सरकारचा आभारी आहे, असे ते म्हणाले.

राज्यात रेल्वेचे पावणेदोन लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत, असे सांगून ते म्हणाले की, युपीए सरकारच्या काळात दहा वर्षांत राज्याला रेल्वेकरिता मिळाले होते त्याहूनही अधिक निधी मोदी सरकारने एका वर्षात दिला. मोदी सरकारच्या सहकार्यातून राज्यात पायाभूत सुविधांची सहा लाख कोटींची कामे सुरू आहेत. एकाच वर्षात राज्यातील गरीब लाभार्थींकरिता 30 लाख घरे मंजूर करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थींची सर्व यादी पूर्ण झाली असून नवी यादी तयार करण्याचे केंद्राने सुचविले आहे. ‘प्रत्येकाला घर’ हा मोदी सरकारचा संकल्प आहे.

गरीब कल्याणाचा ध्यास घेऊन देशात मोदींनी विविध योजना राबविल्या. कोविडच्या काळापासून देशातील 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले, 12 कोटी शौचालये झाली, मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया अंतर्गत अनुसूचित जातिजमातींच्या लाभार्थींना 14 हजार 700 कोटींचे कर्ज देऊन आत्मनिर्भरतेचा आधार दिल्यामुळे या वर्गाचे जीवनमान उंचावले आहे. मोदी सरकारच्या काळात 55 कोटी जनधन खाती उघडली गेली, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा 51 कोटी लोकांना लाभ मिळाला, आयुष्मान भारत योजनेत 77 कोटी खाती नोंदविली गेली असून यातून कोट्यवधी गरीबांना मोफत आरोग्य सेवा मिळत आहेत. मोदी सरकाने आतापर्यंत थेट खात्यात दिलेल्या एकत्रित लाभांची किंमत 42 लाख कोटींची आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

मोदी पर्वात लाखो घरांचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून सामान्यांची घरे विजेने उजळली आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करून गरीब कल्याणाच्या मोदी सरकारच्या अनेक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. मोदी यांच्या नेृत्वाखालील केंद्र सरकारला सर्वसमावेशक चेहरा असून 60 टक्के मंत्री अनुसीचित जाततीजमातींचे आहेत. मोदी सरकारच्या योजनांचे 80 टक्के, तर प्रधानमंत्री आवास योजनेत 45 टक्के, विविध शिष्यवृत्त्यांचे 58 टक्के, मुद्रा योजनेतील 51 टक्के लाभार्थी अनुसूचित जातीजमातीचे आहेत, असे ते म्हणाले.

समाजातील वंचित लोकांना थेट लाभ दिल्यामुळेच 25 कोटी लोकसंख्या गरीबी रेषेच्या वर आली. गेल्या दहा वर्षांत शेती क्षेत्रात पाच पटींनी वाढ झाली. पीएम किसान योजनेअंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 3.7 लाख कोटी रुपये आतापर्यंत दिले गेले आहेत. युपीए सरकारने 80 हजार कोटींच्या कर्जमाफीचा डांगोरा पिटला, तर मोदी सरकारने 3.7 लाख कोटी रुपये दिले. प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत विमा दावे निकाली काढून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा दिला आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या अकरा वर्षांत पिकांच्या हमीभावात सातत्याने वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादनात जवळपास 80 टक्के वाढ झाली आहे, मत्स्योत्पादन वाढले आहे, इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये 38 कोटी लिटर वरून 44 कोटी लिटरपर्यंत वाढ झाली असून त्यामुळे एक लाख कोटींचे परकीय चलन वाचले, त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा मिळाला, असेही ते म्हणाले.
याच काळात मेगा फूड पार्कची संख्या वाढली, सौर पंपांची संख्या 10 लाखांच्या वर गेली असून एकट्या महाराष्ट्रात त्यापैकी पाच लाख पंप आहेत. सहकार क्षेत्रात नवे धोरण आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला गेल्या 50 वर्षांत झाली नाही एवढी मदत मोदी सरकारने केली.

नारीशक्ती वंदन अधिनियमांतर्गत लोकसभेत व विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण, संरक्षणदलात महिलांसाठी कायमस्वरूपी भरती, वायुदलात महिलांना संधी मोदी सरकारमुळे मिळाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून स्त्री पुरुष लोकसंख्येतील मोठा फरक कमी झाला आहे. महिलांसाठीच्या विविध योजनांतून महिलांच्या खात्यात कोट्यवधी रुपये दिले. लखपती दीदी योजनेतून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. 2014 साली स्टार्टअपमध्ये कुठेच नसलेला भारत आता जगातील सर्वात मोठा स्टर्टअप योजनांचा देश ठरला आहे. पगारी महिलांकरिता विविध योजना अंमलात आणून महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच, ईपीएफओ मध्ये होत असलेली लाखोंची नवी नोंदणी हा युवकांना नव्या रोजगार संधी मिळाली असल्याचा पुरावा आहे.

2,297 सरकारी सेवा सर्वसामान्यांकरिता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. युपीआयच्या वापरकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली, 23 शहरांत मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले. मुद्रा योजनेचा दीड कोटी लोकांनी लाभ घेतला आहे, मोफत विजेचे लाखो लाभार्थी देशात आहेत, अशा अनेक कामांची व योजनांची जंत्रीच मुख्यमंत्र्यांनी दिली.
आरोग्य सेवा क्षेत्रातही मोदी सरकारच्या कारकिर्दीत लक्षणीय प्रगती झाली असून एमबीबीएस, पीजीच्या जागा वाढल्याने मोठ्या प्रमाणात डॉक्टर तयार होत आहेत. मोदी सरकारने केलेल्या कामातून स्वाभिमानी भारताचे नवे रूप ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे जगाला दिसले असून ही कारवाई ऐतिहासिक म्हणून इतिहासात नोंदविली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

संरक्षण उपकरणांत भारत स्वयंपूर्ण झाला असून आता आपण संरक्षण सामग्रीची निर्यात करत आहोत. शस्त्रनिर्माणच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्रामुळे निर्यात वाढ झाली असून 74 टक्के एफडीआय झाली आहे. भारतीयांचे जगाच्या मंचावर महत्व वाढले आहे. चांद्रयान -3 मोहिमेने भारताच्या अंतराळ क्षेत्रात आपले जागतिक महत्व अधोरेखित केले आहे. मोदी सरकारने काश्मीरमधील 370 कलम रद्द करून परिवर्तन आणले, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत पुढच्या तीन वर्षांत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील विदेशी गुंतवणुकीचा वेगही वाढला असून महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था‌ म्हणून भारत उभा राहात आहे. असे नमूद करून ते म्हणाले, याच काळात देशात रोजगाराच्या असंख्य नव्या संधी निर्माण झाल्या. 1.8 लाख नव्या कंपन्यांची नोंदणी झाली, अनेक जुने कायदे रद्द करण्यात आले असून नवे समाजाभिमुख कायदे अस्तित्वात आले.

इलेक्ट्रॉनिक्स निर्यात आणि उत्पादनात सहापट वाढ झाली आहे. पायाभूत सुविधांचा विस्तार, विमानतळे 86 झाली. रेल्वे बजेट वाढले, वंदे भारत ट्रेन्समुळे रेल्वे क्रांती, मेट्रो चे जाळे विस्तारले, अमृत भारत योजनेतून रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. 2025 मध्ये महामार्गांच्या निर्मितीचा वेग प्रतिदिन 24 किलोमीटर या वेगाने सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचे नवे प्रकल्प सुरू झाले, ग्रामीण रस्तेबांधणीस वेग आला, 214 लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या, सौरऊर्जा, आणुऊर्जा या अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या उभारणीत मोठी वाढ करण्यात आली.

मोदीजींनी सातत्याने ‘विकास भी और विरासत भी’ हा विचार मांडत सांस्कृतिक व धार्मिक स्थळांच्या सुधारणेकरिता मोठा निधी वितरित केला आहे. मोदी सरकारच्या काळात देशाबाहेर गेलेल्या अनेक मौल्यवान प्राचीन वस्तू परत आणण्यात आल्या, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. कार्यसंस्कृतीतील हा बदल मोदी सरकारच्या काळात देश अनुभवत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दिसणाऱ्या परिवर्तनाचे श्रेयदेखील मोदी सरकारच्या सहकार्यालाच दिले. राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प मोदी सरकारनमुळे गतिमान झाले. परिवर्तनाचे हे पर्व सुरू करून विकासाला वेग देत सामान्य माणसाच्या जीवनात नवा आनंद निर्माण केला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *