काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचे मोदी सरकारचे कृत्य लोकशाहीची हत्या करणारे

मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असताना मोदी सरकारने काँग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. ईडी, सीबीआय या भाजपा कार्यकर्त्यांबरोबर आयकर विभाग या कार्यकर्त्याच्या मदतीने मोदी सरकारने काँग्रेस पक्षाची खातेबंदी केली आहे. निवडणूक काळात काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचे मोदी सरकारचे हे कृत्य लोकशाहीची हत्या करणारे आहे, असा आरोप मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, देशातील सर्व यंत्रणा मोदी सरकारने कमकुवत केल्या आहेत. निवडणुक आयोगही भाजपाच्या हातची कठपुतली बाहुली झाली आहे. या सर्व यंत्रणा फक्त विरोधी पक्षांवर कारवाई करतात. ३० वर्षापूर्वीच्या व्यवहारासाठी आयकर विभागाने आता नोटीस पाठवली आहे, १४ लाख रुपयांसाठी ११० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काँग्रेसच्या बँक खात्यातून काढून घेतली आहे. दोन महिन्यापूर्वीही आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली होती. आता पुन्हा आयकर विभागाला हाताशी धरून बँक खाती गोठवली आहेत. निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळाली पाहिजे परंतु भारतीय जनता पक्ष इलोक्टोरल बाँडमधून मिळालेल्या खंडणीच्या जोरावर वारेमाप खर्च करत आहे, सर्वठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहीराती दिल्या जात आहेत तर दुसरीकडे कॉग्रेसची बँक खाती बंद केल्याने निवडणुकीचा खर्च करणे काँग्रेससाठी अत्यंत कठीण झाले आहे, काँग्रेसने जनतेकडून पैसे जमा केले होते. आयकर विभागाची ही कारवाई पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही.
लोकशाही शासन पद्धतीत निवडणुका या निष्पक्ष व स्वतंत्र झाल्या पाहिजेत पण कॉग्रेसवर कारवाई केली जात असताना भाजपावर कारवाई केली जात नाही. आचार संहिता लागू असतानाही भाजपा सरकार नियमांना धाब्यावर बसवून सर्व काही करत आहे परंतु निवडणुक आयोग, न्यायालय किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा भाजपावर कारवाई करत नाही, नरेंद्र मोदी स्वतः विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर प्रचार करतात पण त्यांना नोटीस पाठवली जात नाही पण राहुल गांधी यांना मात्र नोटीस पाठवली जाते, मोदींना नोटीस पाठवण्यास सरकारी यंत्रणा घाबरतात, निवडणूक आयोगाचा निष्पक्षपातीपणा आता कुठे गेला?
देशातील वातावरण बदलले असून परिवर्तन होणार हे स्पष्ट आहे, भाजपाला पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. पराभवाच्या मानसिकतेतून काँग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी करण्याचे हे खूनसी कृत्य आहे. भाजपाला विजयाची खात्री असती तर भाजपा एवढ्या खालच्या पातळीवर खाली उतरली नसती. देशात लोकशाही नावालाच आहे, कारभार मात्र हकूमशाही पद्धीतनेच सुरु आहे याचे हे आणखी एक उदाहरण आहे. भाजपा शेवटची धडपड करत आहे पण जनता त्यांना सत्तेवरून खाली खेचून सर्व हिशोब’ चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहिते, मुंबई स्लम सेल विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला आणि अखिलेश यादव उपस्थित होते.
SL/ML/SL
22 March 2024