मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसेचा रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा

ठाणे, दि. १० : काल मुब्रा- दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. या नंतर आज राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यातील गाव देवी मैदान येथे रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. यात रेल्वे प्रोटोकॉल मधील त्रुटी आणि चालढकल कारणीभूत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या संदर्भात राज ठाकरे आणि मनसेने ठाण्यापासून मुंब्रा रेल्वे प्रशासनावर आरोप आणि जबाबदारीची मागणी केली आहे. मोर्चा गाव देवी मैदानापासून सुरु होऊन ठाणे स्टेशनपर्यंत पोहोचला. रेल्वे प्रशासनास अति गर्दी नियंत्रण आणि रुळांवर सुरक्षिततेसाठी कदम उचलण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. तसेच या अपघातात, मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळावा अशी मागणी देखील करण्यात आली. या वेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. “आताच सुरक्षेत सुधारणा केली नाही, तर आंदोलन तीव्र करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
- मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.
- आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही. आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही.
- प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे.
- राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे.
- आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का? मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही.