देशातून लाखो टन गहू गायब

नवी दिल्ली,दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाने देशभर धुमाकुळ घातल्याने अन्नधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी सरकारकडून अन्नधान्याचा साठा राखून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत. सरकारने नुकतीच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जून महिन्याच सरकारने गव्हाच्या साठवणूकीवरही मर्यादा घातली होती. सरकारकडून अन्नधान्याच्या साठ्याची सातत्याने तपासणी सुरू आहे. मात्र आता देशातील किमान ४०० ते ४५० लाख टन गव्हाचा साठा सरकारच्या रडारबाहेर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशात गहू आणि गहू पिठाच्या दरात मे महिन्यापासून वाढ होत आहे. मागील काही दिवसांमध्ये जास्त दर वाढले. यामुळे सरकारची चिंता वाढली. परिणामी सरकार देशातील गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी विविध उपायांची चाचपणी करत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, देशात यंदा १ हजार १२७ लाख टनांचे गहू उत्पादन झाले. नव्या हंगा्मातील गहू एप्रिलपासून बाजारात आला. यापैकी सरकारने २६२ लाख टनांची खरेदी केली. तर ३०० ते ३५० लाख टनांचा देशात वापर झाला. यात बियाणे आणि खाण्यासाठीचा वापर आहे. तर व्यापारी, स्टॉकीस्ट आणि मिलर्स यांनी ९० ते १०० लाख टनांचा स्टॉक असल्याचे जाहीर केले. म्हणजेच सरकारकडे ६५० ते ७०० लाख टन गव्हाची नोंद झाली.
यावरून ४०० ते ४५० लाख टन गव्हाचा सरकारला तपास लागत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या गव्हाची साठेबाजी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या रडारबाहेर असलेला हा ४०० ते ४५० लाख टन गहू नेमका कुणाकडे आहे? याचीही माहीती नाही. त्यामुळे हा गहू बाजारात नेमका कधी येईल हेही सांगता येत नाही.
SL/KA/SL
4 Aug 2023