मुंबई मेट्रो २ए व ७ मार्गिकांवर २० कोटी प्रवासीसंख्येचा टप्पा पार

मुंबई दि ४ — मुंबईच्या मेट्रो प्रवासाने आज एक मोठा टप्पा गाठला आहे. महा मुंबई मेट्रो नेटवर्कमधील २ए आणि ७ या मार्गिकांवर केवळ ३९ महिन्यांत एकूण २० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबईकरांचे जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे.
एमएमआरडीएने केलेल्या लक्ष्यकेंद्रीत अंमलबजावणीमुळे आणि एमएमएमओसीएलच्या सहकार्यामुळे हा उल्लेखनीय टप्पा साध्य झाला आहे.
महामुंबई मेट्रोची सुरूवात झाल्यापासून प्रवाशांचा विश्वास आणि प्रवासाची संख्या सातत्याने वाढत आहे. या वाटचालीतील काही महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :
📍 २ एप्रिल, २०२२ : एका दिवसात १९,४५१ प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला
📍 २७ जानेवारी, २०२३ : एकूण प्रवासीसंख्या १ कोटी
📍 २८ मे, २०२४ : एकूण प्रवासीसंख्या १० कोटी
📍 ४ जानेवारी, २०२५ : एकूण प्रवासीसंख्या १५ कोटी
📍 ८ जुलै, २०२५ : एका दिवसात विक्रमी ३ लाखांहून अधिक प्रवासी
📍 ऑगस्ट, २०२५ : एकूण प्रवासीसंख्या २० कोटींच्या पुढे आणि वाढतच आहे
कार्यालयीन कर्मचारी वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त व्हावेत, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व वातानुकूलित प्रवास मिळावा, यासाठी मेट्रोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपनगरांना जोडणारी, रस्त्यांवरील वाहतूक कमी करणारी आणि प्रवासाचा वेळ निम्म्याहून अधिक कमी करणारी ही व्यवस्था आज मुंबईकरांसाठी खरी जीवनवाहिनी ठरली आहे.
केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता मेट्रोने शहरी जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे.
मेट्रोमुळे :
प्रमुख मार्गांवरील प्रवासाचा वेळ कमी झाला आहे.
सुरक्षित, विश्वासार्ह, वातानुकूलित प्रवास उपलब्ध झाला आहे.
रस्त्यावरील वाहतूक व उत्सर्जन कमी झाले आहे.
मुंबईपासून लांब असलेली उपनगरे मुंबईतील मध्यवर्ती भागांशी जोडली गेली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हणाले :
“महाराष्ट्राच्या विकासाचा कणा म्हणजे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही जीवनवाहिनी आहे. २० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला जाणे, यातून मुंबईकरांचा मेट्रोवरील विश्वास दिसून येतो. या महानगरातील प्रत्येक भागात अधिक सुविधा, अधिक जोडणी आणि अधिक स्वच्छ हवा उपलब्ध करून देण्यासाठी हे नेटवर्क विस्तारण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.”

उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे म्हणाले :
“महा मुंबई मेट्रोचा यशस्वी प्रवास हे वेळेत अंमलबजावणी आणि लोककेंद्री नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. हे केवळ वाहतूक व्यवस्थेचे यश नसून, नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. प्रत्येक मेट्रो प्रवासासोबत आपण एका अशा मुंबईकडे वाटचाल करत आहोत, जिथे सर्व घटक जोडले जातील आणि कुणीही मागे राहणार नाही.”

हा परिणाम केवळ शहरी सोयीपुरता मर्यादित नाही. प्रत्येक मेट्रो प्रवास एखाद्या खासगी वाहनाचा पर्याय आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी व कार्बन उत्सर्जन कमी होण्यास हातभार लागतो. सध्या मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवर दररोज ३ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून यातून जलद सार्वजनिक वाहतूक प्रणालीकडे होणारा शहराचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यात वाढ होत आहे.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) म्हणाले :
“२० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठणे हा केवळ एक आकडा नाही, तर जनतेच्या सामूहिक इच्छाशक्तीने आणि संस्थात्मक दूरदृष्टीने घडणाऱ्या बदलत्या मुंबईची गोष्ट आहे. दर महिन्याला ४ ते ५ टक्के दराने वाढणारी प्रवासीसंख्या हेच दाखवते की मुंबईकर आता अधिक स्मार्ट आणि शाश्वत प्रवासाच्या पर्यायांकडे वळत आहेत. हे उल्लेखनीय यश त्या प्रत्येक नागरिकामुळे शक्य झाले आहे, ज्याने मेट्रोवर विश्वास ठेवत आपला प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि पर्यावरणस्नेही करण्याची निवड केली. आपण सर्वजण मिळून भविष्याच्या दृष्टीने सक्षम अशी मुंबई उभारत आहोत.”

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) व्यवस्थापकीय संचालिका, रुबल अग्रवाल (भा.प्र.से.) म्हणाल्या :
“हा टप्पा गाठणे म्हणजे उत्कृष्ट समन्वय, समर्पित टीम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांच्या विश्वासाचे फलित आहे. आमच्या ऑपरेशन्स टीम्स २४x७ काम करत असून, प्रवासाची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि स्वच्छता टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. पुढील टप्प्यात आम्ही सेवा वारंवारता वाढवत आहोत, डिजिटल तिकीट प्रणाली अधिक सक्षम करत आहोत आणि लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी अधिक बळकट करत आहोत.”

सध्या अनेक नवीन मेट्रो मार्गिकांचे काम सुरू असून आणि बहुविध परिवहन साधनांची जोडणी करण्यावर भर दिला जात असल्याने, महामुंबई मेट्रो केवळ शहराच्या वेगाने वाढत आहेच, त्याचप्रमाणे या विकासाला दिशा देत आहे.
हा टप्पा गाठण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे एम एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएल आभार मानते. कारण प्रत्येक धावणाऱ्या मेट्रोमध्ये आणि प्रत्येक प्रवासात, मुंबई फक्त पुढे जात नाही, तर ती अधिक स्मार्टपणे पुढची वाटचाल करते आहे. ML/ML/MS