प्रश्न उपस्थित करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना आता चाप…

मुंबई दि २४– विधानसभेत प्रश्न उपस्थित करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे प्रश्न यापुढे प्राधान्याने घेण्यास निर्बंध घालण्याची शिफारस आपण संबंधित निर्णय समितीकडे करू असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. आज पेण अर्बन बँकेच्या संबंधितचा प्रश्न सभागृहात चर्चेला आला त्यावेळी तो उपस्थित करणारे पराग शाह आणि इतर सदस्य उपस्थित नव्हते त्यावेळी अध्यक्षांनी हे जाहीर केलं.
या बँकेत असणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवी नेमक्या कधी परत देणार असे प्रश्न संजय केळकर, प्रकाश सोळंके, नारायण कुचे, प्रशांत ठाकूर, अतुल भातखळकर यांनी वारंवार उपस्थित केला, अध्यक्षांनी ही यावर मंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देण्यास सांगितलं. आधी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि नंतर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित बाब न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत होते. बँकेच्या १४३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत त्यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल आहे, त्यावर निर्णय आल्यावरच ठेवी परत करण्यात येतील असं मंत्री पाटील यांनी सांगितलं.
नादुरुस्त शाळांसाठी तरतूद अपुरी
राज्यात एकूण साठ हजार ३४४ सरकारी शाळा असून त्यातील २३, २७३ शाळांना दुरुस्तीची आवश्यकता आहे, तर बावीस हजाराहून अधिक शाळा धोकादायक आहे, यावर्षी त्यासाठी १६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा निधी अपुरा असल्याची कबुली शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. शाळांची ही अवस्था वर्षानुवर्षे आहे, आधीच्या सरकारांच्या काळात त्याकडे हवे तसे लक्ष न दिल्याने ही अवस्था झाली अशी माहिती राज्यमंत्री भोयर यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न कैलास पाटील यांनी उपस्थित केला होता, त्यावर श्रीजया चव्हाण, अमित देशमुख, अभिमन्यू पवार यांनी उपप्रश्न विचारले होते.