माध्यमं बदलत आहेत, पण वाचक संपणार नाहीत

ठाणे, दि. ३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘ डिजिटल क्रांतीमुळे अनेक माध्यमे एकाचवेळी उपलब्ध झाली आहेत. पूर्वी फक्त पुस्तकं आणि अल्पप्रमाणात टी. व्ही. इतकेच पर्याय लोकांसमोर होते, साहजिकच वाचनाला महत्त्व होतं. मात्र आज भरपूर पर्याय असल्याने वाचणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी वाचक संपणार नाहीत, अन्य माध्यमांचे नावीन्य ओसरले की लोक पुन्हा वाचनाकडेच वळतील ‘ असा आशावाद आजचे आघाडीचे कथाकार गणेश मतकरी यांनी व्यक्त केला. प्रदीप वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या ‘ लेखकाशी गप्पा ‘ या कार्यक्रमात ते बोलत होते. मकरंद जोशी यांनी नेमके प्रश्न विचारून मतकरी यांना बोलतं केलं.
महानगर वर्तमानपत्रात सिने समिक्षा करण्यापासून आज कथा लेखनापर्यंत आपला लेखन प्रवास कसा झाला हे गणेश मतकरी यांनी तपशीलवार सांगितले. ‘ खिडक्या अर्ध्या उघड्या ‘ ही कथामाला ( किंवा कादंबरी ) लिहायला सुरवात केली तेंव्हा आधी ती पुढे कशी जाईल, त्यातील व्यक्तिरेखांचा प्रवास कसा होईल हे आपल्याला माहीत नव्हते, पण जसजसा लिहित गेलो तसे चित्र बनत गेले असे त्यांनी सांगितले. भारतीय आणि जागतिक सिनेमाचा अभ्यास असल्याने, वेगवेगळ्या धर्तीचे सिनेमा सतत पहात असल्याने, सिनेतंत्राचा प्रभाव , परिणाम कथा लेखनावर होतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘ जाणीवपूर्वक तसं करत नाही पण कथनशैली, कथेची मांडणी करताना कळत नकळत काही वेळा तसं होतं मात्र मी अमूक पध्दतीने कथा लिहायची असं ठरवून कधी लिहित नाही. ‘ असे मतकरींनी सांगितले.
पांघरूण, भाई- व्यक्ती की वल्ली या चित्रपटांच्या पटकथा लिहिणाऱ्या मतकरी यांनी ‘ पटकथा लेखन आणि कथा लेखन ‘ यातील फरक स्पष्ट करताना सांगितले की कथा लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असतं, त्याच्यावर बजेट, भाषा, पार्श्वभूमी, पात्रांची संख्या, प्रसंगाची संख्या अशी कोणतीही बंधने नसतात. मात्र चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने तिथे पटकथा त्याच्या दृष्टिकोनातून लिहावी लागते, शिवाय दृकश्राव्य माध्यम असल्याने अनेक निर्बंध येतात.
‘ चौकटीबाहेरचा सिनेमा ‘ ,
‘ फिल्ममेकर्स ‘ , ‘ चित्रपट प्रवाहांचा इतिहास – जागतिक आणि भारतीय ‘ अशी सिनेमावरील महत्वाची, संदर्भ ग्रंथ ठरावीत अशी पुस्तके लिहिणाऱ्या गणेश मतकरी यांनी सिनेमाचा अभ्यास कसा केला हे सांगताना, ” सिनेमाचा गोडी लागल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहात गेलो. प्रभात चित्र मंडळाचा सभासद झाल्यावर देशातील आणि परदेशातील नवीन, महोत्सवात गाजलेले, वेगळ्या धर्तीचे सिनेमा बघायला मिळाले. अरूण खोपकरांसारख्या जाणकार चित्रपट दिग्दर्शकाचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे सिनेमाची नजर तयार झाली. सुधीर नांदगावकरांनी प्रोत्साहन दिल्यामुळे रुपवाणी मधून लिहायला लागलो आणि त्यातून सिनेमाचा अभ्यास पक्का झाला ” असे मतकरींनी सांगितले.
सिनेमा प्रेम, आगळ्या पध्दतीचे कथा लेखन याबरोबरच गणेश मतकरी हे नाव जोडलेलं आहे ते मोठ्ठा ग्रंथसंग्रह आणि अफाट वाचन याच्याशी.
‘ शेल्फी ‘ सारखे पुस्तक, ललित मासिकातील
‘ बिब्लिओफाइल ‘ हे सदर यातून त्यांच्या वाचन समृध्दीची कल्पना येते. आपल्या वाचनाबद्दल मतकरींनी सांगितले की रहस्यकथा, मर्डर मिस्त्री, गूढकथा या प्रकारचे साहित्य वाचायला अधिक आवडतं. त्यातही ग्राफिक नॉवेल्स हा प्रकार विशेष आवडता आहे असे सांगून त्यांनी कॉमिक्स आणि ग्राफिक नॉवेल्स मधला फरक समजावून सांगितला. मराठीत ग्राफिक नॉवेल्स नाहीत कारण त्या अतिशय खर्चिक असतात. संपूर्णपणे चित्रातून कादंबरी मांडली जात असल्याने चित्रकाराचे मानधन खूप असते, त्यामुळे मराठीत हा प्रयोग करायला कोणी धजावत नसावे. अनेक इंग्रजी कादंबरीकारांविषयी , त्यांच्या कादंबऱ्यांबाबत भरभरून लिहिणाऱ्या गणेश मतकरींनी त्यातील एखाद्या कादंबरीचा मराठी अनुवाद करावासा वाटत नाही का? यावर सांगितले की ” जरी मी मराठी लिहित असलो तरी अनुवादासाठी लागणारं भाषिक कौशल्य माझ्याकडे नाही . शिवाय अनुवाद करण्यासाठी जो वेळ द्यावा लागेल त्यामुळे माझं स्वत:चं लेखन मागे पडेल. मात्र एखाद्या प्रकाशनाने असाइनमेंट दिलीच तर नक्कीच अनुवाद करेन.
‘ बटरफ्लाय इफेक्ट ‘ , ‘ फ्री फॉल ‘ सारख्या कथासंग्रहातील कथा वेगवेगळ्या मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत पण तरीही त्यांच्यात एक अंत:सूत्र आहे याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर देताना मतकरी म्हणाले ‘ सध्या मराठी मासिकांचे प्रमाण अगदीच रोडावले आहे. त्यामुळे वर्षभर सातत्याने कथा लेखन केले जात नाही. दिवाळी अंकांसाठीच लेखन केले जात असल्याने एका विशिष्ट काल मर्यादेत लेखन केलं जातं स्वाभाविकच त्या त्या वेळी जे विचार मंथन सुरू असतं, ज्या प्रकारची सूत्र सुचत असतात त्यामुळे त्यावेळच्या कथांवर तोच प्रभाव पडतो. अर्थात अंत:सूत्र एक असलं तरी कथांमध्ये पुनरावृत्ती नसते, कथा पूर्णपणे वेगळ्याच असतात.
या मुलाखतीत गणेश मतकरी यांनी आपल्या वडिलांच्या रत्नाकर मतकरी यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. बालनाट्यापासून ते गूढकथांपर्यंत अनेक आकृतीबंध, साहित्य प्रकार सहज हाताळणारे रत्नाकर मतकरी किती शिस्तबद्ध पध्दतीने लेखन करायचे हे सांगून आपल्या पहिल्या कथेबाबत त्यांनी केलेल्या सूणनेमुळेच तिचे कथा मालिकेत कसे रुपांतर झाले हे सांगितले. सिनेमांपासून ते पुस्तकांपर्यंतच्या या गप्पा जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीमुळे आणखी रंगल्या. प्रदीप वाचनालयाचे माधव टिळक यांनी आभार प्रदर्शन केले.
ML/KA/SL
3 Dec. 2023