माथाडी कामगारांच्या आंदोलन जल्लोषात.

मुंबई, दि 20:-
विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या राज्य स्तरावरील धोरणात्मक प्रश्नासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेसमोर संबंधितांची माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक लावण्याचा प्रयत्न करण्याचे आणि माथाडी कामगारांचे माथाडी मंडळाच्या अखता-यातील दैनंदिन प्रलंबित प्रश्न संबंधित माथाडी मंडळाकडे सादर केल्यानंतर त्याची एक महिन्याच्या आंत सोडवणुक करण्याचा व माथाडी बोर्डाच्या अधिका-यांची कामगार आयुक्त व सह कामगार आयुक्त (माथाडी) यांचेसमोर कृती समितीसमवेत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त डॉ.एस.पी. तुम्मोड व सह कामगार आयुक्त (माथाडी) यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
राज्यात माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीच्यावतिने मंगळवार दि.20 मे, 2025 रोजी सकाळी 10-30 वाजल्यापासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पुर्व), मुंबई येथिल महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयासमोर कृती समितीचे अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सत्यागृह आंदोलन करण्यात आले, त्यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळा समवेत कामगार भवनमधील कार्यालयात झालेल्या बैठकित हे आश्वासन देण्यात आले.
या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते दिपक रामिष्टे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार, अखिल महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे डी. एस. शिंदे, अखिल भारतीय माथाडी, सुरक्षा रक्षक श्रमजिवी आणि जनरल कामगार युनियनचे नेते अरुण रांजणे, राजन म्हात्रे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या श्रीमती नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, ट्रान्सपोर्ट अॅण्ड डाँक वर्कर्स युनियनचे निवृत्ती धुमाळ, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट, ग्रोसरी, गोदी, सुरक्षा रक्षक व जनरल कामगार युनियनचे श्री. सतीशराव जाधव आदी युनियनचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तसेच कामगार नेते गुलाबराव जगताप, बळवंतराव पवार, सुभाष लोमटे, राजकुमार घायाळ व इतर नेत्यांनी मार्गदर्शन केले.
माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे, माथाडी कामगारांना नोंदीत न करणे, बेकायदेशिररित्या कामावरुन काढलेल्या कामगारांना न्याय न देणे, शासनाचे आदेशाची अंमलबजावणी न करणे, वेळेवर पगार न करणे, वेतनवाढ वेळेत व योग्य न करणे, कामगारांना दंड आकारणे, थकबाकी वसुलीला विलंब लावणे, RRC’s’ वसुलीसाठी पाठपुरावा न करणे, खाजगी बाजार समित्यात कायद्याची अंमलबजावणी न करणे, कापूस फेडरेशन व एकाही साखर कारखान्यात कायदा न लावणे, एमआयडीसी मधील ५% कारखान्यातही माथाडी कायद्याची अंमलबजावणी न करणे व इतर प्रश्नांचा समावेश आहे.
विविध माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगारांच्या वर नमुद केलेल्या प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांना माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीने सादर केले असून, कामगार आयुक्त, सह कामगार आयुक्त (माथाडी), विविध माथाडी मंडळाचे चेअरमन व सेक्रेटरी यांचेसमवेत कृती समितीची संयुक्त बैठक घ्यावी आणि प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात कृती समितीने केली आहे.
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडून माथाडी अॅक्ट, १९६९ या कायद्याची आणि विविध माथाडी मंडळाच्या स्थापना करुन घेतल्या, या अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राज्य शासन व कामगार विभागाकडे केली आहे, त्यावर राज्य शासनाने दुर्लक्ष करुन माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३ अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणले, त्यावेळी माथाडी कामगारांच्या हक्काला बाधा येणार नाही याकरीतां नियमावलीचे शासन निर्णय पारीत करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे, परंतु त्याबाबत संयुक्त बैठक कृती समितीबरोबर घेतली जात नाही, कृती समितीने लाक्षणिक संप, आमरण उपोषण निदर्शने यासारखी तीव्र आंदोलने केली, परंतु राज्य सरकारने आश्वासन दिली आहेत म्हणून आतां कामगार आयुक्त कार्यालयासमोर केले जाणारे आंदोलन हे तीव्र करण्याचा निर्णय घेणे भाग पडेल, असा इधारा माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीने दिला आहे. KK.MS