मराठवाडा उपोषणाचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता, सरकारकडून नवे निर्णय

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रद्द झालेले मराठा आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी म्हणून दाखले दिले जातील आणि निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करून याबाबत आपला अहवाल देईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली .
मराठा आरक्षणावर उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या विशेष बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाच्या आडून कोणी राजकारण करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लाठीमार प्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जात आहे. चुकीच्या पद्धतीने दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील , झालेली ही दुर्घटना दुर्दैवी आहे त्याबद्दल मी खेद व्यक्त केला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी देखील मागितली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाबाबत आजच शासन आदेश काढले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यानी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अंतरवली सराटी इथे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि स्थानिक आमदार राजेश टोपे यांनी जरांगे यांना याची माहिती दिली. याच दरम्यान मुख्यमंत्र्यानी देखील जरांगे यांच्याशी फोनवरून बातचीत केली. त्यावर उद्या सकाळी अकरा वाजता आपला निर्णय घेऊ असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले.
ML/KA/SL
6 Sept. 2023