मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी उघडली तोंडे…

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल संध्याकाळी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झालेल्या तिन्ही पक्ष नेत्यांनी आज आपली तोंडे उघडली असून प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण सर्वसामान्य कार्यकर्ता असून आपल्याला कोणीही कसेही फेकून दिले तर चालते , आपण मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली अशी प्रतिक्रिया दिली आहे. तेहतीस वर्षांपूर्वी भुजबळ यांनी शिवसेनेतून फुटून नागपुरातच मंत्रीपदाची शपथ घेतली होती, त्यामुळे हा नियतीचा काव्यगत न्याय मिळाला की काय अशी चर्चा आहे.
भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याला वगळण्याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. आपण मंत्रिमंडळात असल्याचे मला आधी सांगण्यात आले होते मात्र आयत्यावेळी डावलण्यात आले असे माध्यमांना सांगितले. यावर मुनगंटीवार यांना केंद्रीय नेतृत्वाकडून अन्य संधी देण्यात येईल त्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकर यांनी कालच आपल्या उपनेते पदाचा राजीनामा देत आपण मंत्री म्हणून अधिक चांगले कार्य केले असते असे म्हटले. तर विजय शिवतारे यांनी आपल्याला तिन्ही नेत्यांनी चांगली वागणूक दिली नाही, साधी भेट ही दिली नाही, आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिले तरी घेणार नाही अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. वगळण्यात आलेले अन्य मंत्री तानाजी सावंत हे कालच नागपूर हून थेट पुण्याला निघून गेले आहेत.
ML/ML/PGB 16 Dec 2024