मंत्रालयात लक्ष्मीदर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

 मंत्रालयात लक्ष्मीदर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई, दि.२२ – राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या अधिकृत चहापानावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. मंत्रालयात उघडपणे सुरू असलेले ‘लक्ष्मीदर्शन’, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि घटनात्मक पदांचा होणारा अवमान या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात की अपघात याबाबत राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सरकारची भूमिका संदिग्ध आहे. अजित दादा यांच्या मृत्यूनंतर शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला.इतकी घाई कुणाला होती? जर ही प्रक्रिया योग्य होती तर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती का दिली असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. जानेवारी महिन्यात एकट्या मराठवाडयात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाधिक २४ शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत.शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचे धोरण नाही,शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवूनही अजूनही राज्य सरकारला निधी मिळालेला नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकरी सावकारांच्या पाशात अडकला आहे.चंद्रपूर येथील शेतकऱ्याला किडनी विकण्याची वेळ आली असे विदारक चित्र महाराष्ट्रात आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

मंत्रालयात थेट लक्ष्मीदर्शन सुरू असून एसीबीने धाड टाकली. मंत्री झिरवळ यांच्या पीएला अटक करण्यात आली. आणि अजूनही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही.राज्यात उच्चपदस्थ मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या ड्रग फॅक्टरी वर पोलिसांनी धाड टाकली पण त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मंत्री संजय शिरसाठ, योगेश कदम यांच्याविरोधात पुरावे देऊन देखील सरकार कारवाई करत नसल्याने त्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. राज्यात वीजदर कमी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. पण महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. जनतेची ही फसवणूक असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून स्वतःचे मार्केटिंग करत आहे पण मुलुंड मध्ये मेट्रोमधील स्लॅब कोसळून एकाच मृत्यू झाला. एमएमआरडीने बांधलेला पूल हा आठवे आश्चर्य मानावे लागेल.शहरात लोकांनी जगायचे कसे?रस्त्यावर चालताना मृत्यू, विधानसभा अध्यक्षांची दादागिरी सुरू आहे. महायुतीचे बहुमताचे सरकार असूनही त्यांना विरोधी पक्षाची भीती का आहे असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गावर आक्षेप घेतला.या महामार्गाला शेतकऱ्यांनी स्पष्ट विरोध केला तरी जमीन मोजणीचे काम सरकारने सुरू केले आहे.परभणी इथे तर शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे हा महामार्ग कंत्राटदारासाठी शेतकऱ्यांवर थोपवला जात असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी केला. मंत्रालयात मंत्री झिरवळ यांच्या कार्यालयात एसीबी धाड टाकते हे मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही. एसीबी इतके स्वतंत्रपणे काम करत असेल तर आम्ही त्यांचा सत्कार करू असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजय चौधरी, सुनील प्रभू उपस्थित होते. तर काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार,सतेज पाटील अमीन पटेल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार मिलिंद कांबळे उपस्थित होते.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *