मनोज जरांगे यांचे उपोषण मागे, सरकारला दिली अधिक मुदत

जालना, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन जानेवारीपर्यंत ची मुदत वाढवून देत मनोज जरांगे यांनी आज आपले उपोषण मागे घेतले आहे, त्याआधी त्यांची सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली त्यातून हा प्रश्न तात्पुरता सुटला आहे.
संदीपन भूमरे, अतुल सावे , उदय सामंत , धनंजय मुंडे या चार मंत्र्यांसह दोन माजी न्यायमूर्ती आणि आ बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाने आज संध्याकाळी जरांगे यांची अंतरवाली सराटी इथे उपोषण स्थळी भेट घेतली. यात माजी न्यायमूर्तींनी त्यांना आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यामुळे आरक्षण देण्यासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगितले.
यानंतर सर्व मंत्री आणि आ कडू यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली, त्यावर जरांगे यांनी उपस्थित आंदोलक कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि सरकारला अधिक मुदत द्यायला हरकत नसल्याचे म्हटले मात्र ही शेवटची मुदत असून सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली. आधी २४ डिसेंबर ही मुदत त्यांनी नक्की केली मात्र मंत्री मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा केली जाईल आणि दोन जानेवारी पर्यंत मुदत मागितली . अखेर ही मुदत मान्य करीत जरांगे यांनी उपोषण सोडले, तरी आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहील असे त्यांनी जाहीर केले.
ML/KA/PGB 2 Nov 2023