महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार – अजित पवार

 महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार – अजित पवार

पुणे – बालेवाडी दि. १० जून – महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार आहे असे जाहीर करतानाच याअगोदरही राज्य आणि देशासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे या निश्चित धोरणाने काम करतोय असे सांगतानाच लोकांमध्ये मिसळा सुखद:खात सहभागी व्हा.यापुढे पक्षाची कार्यालये गजबजलेली दिसली पाहिजेत असे आवाहनही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्राची अस्मिता जपताना देशाची उज्ज्वल प्रगती ही राष्ट्रवादी काँग्रेसने बघितली आणि आज बघता बघता २६ वर्षात पदार्पण करत आहे. आज वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे यापुढे वेगवेगळ्या जिल्ह्यात साजरा करण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.

आम्ही भाजपसोबत गेलो म्हणून टिका करतात पण आम्ही २०१९ मध्ये शिवसेनेसोबत गेलो होतो की, त्यावेळी तडजोड केली होती ना. मग आता टिका कशासाठी केली जात आहे असा सवाल करतानाच आपण लोकांना दिशा दाखवणारे व बेरजेचे राजकारण करणारे आहोत हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

काही लोक जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी फिरवला म्हणून टिका करत आहेत. आदिवासी विकास विभागाला ४१ टक्के निधी नाही. लोकांशी संवाद साधला. त्यात आमचे काय चुकले याचा अभ्यास करून त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. जेवढे आपल्याला झेपेल तेवढेच केले. सर्व सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग करता येत नाही हे सर्व बघून हा निर्णय यशस्वी झाला आहे असेही अजित पवार म्हणाले.

काही बातम्या सोडतात… अजित पवार पैसे सोडत नाहीत.. अरे मी काय पैसे खिशात घेऊन फिरतो का? .. असा संतप्त सवाल अजित पवार यांनी करतानाच तीन टप्प्यात निधी कसा सोडावा लागतो हे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहे. या विचारांशी कधी तडजोड करणार नाही आणि हा तडजोडीचा विचार मनात येईल त्यावेळी पायाला तडा गेल्याशिवाय राहणार नाही असेही अजितदादा पवार यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीमध्ये कट्टरवाद असता कामा नये. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असून एकता, समता, बंधुता, शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात टिकून आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

जोपर्यंत आम्ही महायुतीमध्ये काम करतोय तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे थांबवणार नाही असा शब्द अजितदादा पवार यांनी भर मेळाव्यात दिला.

सर्वसमावेशक भूमिका आपल्या पक्षाची आणि अजितदादांची – प्रफुल पटेल

सर्वसमावेशक भूमिका आपल्या पक्षाची आणि अजितदादांची आहे. आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहोत. सत्तेचा फायदा आपला पक्ष जनतेसाठी करत आहे. लाडकी बहीण योजनेला इतर खात्याचे पैसे फिरवले, सरकारची तिजोरी खाली आहे ही सर्व अफवा आहे. बदनाम करणे सोपे आहे हे सर्व विरोधी पक्ष करत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका, महायुती सरकारच्या योजना कशा चांगल्या आहेत हे जनतेला सांगण्याची गरज आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

या पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून आम्ही करत आलो आहोत. आपल्या पक्षाचा २६ वर्षाचा प्रवास कमी नाहीय. अजून खूप आपल्याला प्रवास करायचा असून अनेक लोकांना आपल्या पक्षात आणून पक्ष अजून वाढवायचा आहे. २०१४ मध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता. आमचाच नाही तर अनेक जणांचा असा प्रयत्न होता. अडीच वर्षापूर्वी निर्णय घेतला त्याअगोदर २०१४ पासून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला होता असे पुन्हा एकदा प्रफुल पटेल यांनी अधोरेखित केले.

पक्षातील नवीन पिढी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा झंझावात पुढे नेईल – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस आज २६ वर्षात पदार्पण करताना राज्यात तो मोठया प्रमाणात वाढेल आणि आजची पक्षातील नवीन पिढी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा झंझावात पुढे नेईल असा जोरदार विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी वर्धापन दिन कार्यक्रमात व्यक्त केला.

दोन वर्षापूर्वी अजितदादांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेतला गेला. त्यानंतर झालेल्या लोकसभेत आपल्याला अपयश आले. मात्र विधानसभेत आपण आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. पक्षाला मिळालेले हे मोठे यश पचवून उद्याच्या जबाबदारीसाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

महाराष्ट्रातील जनता आपल्या अजितदादांचे नेतृत्व गुण ओळखते. सतत जनतेत राहून काम करणाऱ्या अजितदादा पवार यांनी राज्यातील अडीच कोटी बहिणींना लाडकी बहीण योजना दिली हे निर्विवाद सत्य आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम यशस्वी राबवली त्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव मांडला तर
दुसरा राजकीय ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात केलेल्या सक्षम वाटचालीला पाठींबा जाहीर करणारा ठराव मांडला.

आज सकाळी १०.१० वाजता प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुपारी क्रीडा संकुलात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभागृहात आगमन झाले.

कार्यक्रमात महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सयाजी शिंदे, संजय बनसोडे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषधमंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी खासदार समीर भुजबळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार नितीन पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवा नेते पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *