तापी महाकाय पुनर्भरण योजनेस मध्यप्रदेश , महाराष्ट्र राज्याची सहमती

 तापी महाकाय पुनर्भरण योजनेस मध्यप्रदेश , महाराष्ट्र राज्याची सहमती

भोपाळ दि १०– आज जलसंपदा विभागाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये भोपाळ येथे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये जलसंपदा विभागाच्या विविध आंतरराज्यीय प्रकल्पांच्या संदर्भात बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाली व प्रकल्प पुढे नेण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार देखील करण्यात आले .

सदर बैठकीस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार अर्चना दीदी चिटणीस , महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के तसेच आंतरराज्य प्रकल्प नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण व पथदर्शी ठरणाऱ्या तापी महाकाय पुनर्भरण योजना हा आंतरराज्यीय प्रकल्प हाती घेण्यासंदर्भात MoU) (सांमजस्य करार) केला. या प्रकल्पामु‌ळे महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तसेच अमरावती व अकोला जिल्यातील धारणी, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, तेल्हारा, अकोट, जळगाव जामोद व संग्रामपुर या तालुक्यातील सुमारे २,१३,७०६ हेक्टर एवढ्या क्षेत्रास व मध्यप्रदेश राज्यातील खंडवा व बुऱ्‍हाणपूर या जिल्ह्यातील खलवा, नेपानगर, खकनार व बुऱ्हाणपूर तालुक्यातील सुमारे ९६,०८२ हेक्टर एवढ्या क्षेत्रास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

अशाप्रकारे या प्रकल्पामुळे एकूण ३,०९,७८८ हेक्टर क्षेत्रास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभमिळणार आहे व सुमारे ४८,००० हेक्टर क्षेत्रास प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

या प्रकल्पाचा पाणीवापर सुमारे ३९.१३ TMC एवढा असून प्रकल्पांतर्गत खारीया गुटीघाट येथे ८.३१ TMC एवढया क्षमतेचा Diversion weir बांधणे प्रस्तावित आहे व बंधाऱ्यापासून सुमारे २२१ कि. मी. एवढ्या लांबीचा उजवा कालवा व सुमारे २६० कि.मी. एवढ्या लांबीचा डावा कालवा प्रस्तावित आहे. सदर कालव्यातून स्थानिक नद्या व Streams यामध्ये Recharge साठी पाणी सोडणे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पाचे सर्वेक्षण अत्याधुनिक अशा LIDAR (लीडार) या तंत्रज्ञानाने केलेलं आहे. या प्रकल्पाची किंमत रु.१९,२४४ कोटी इतकी असून देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकल्पासाठी बाह्य स्त्रोतांतून आर्थिक सहाय्य उपलब्ध करणेबाबत आश्वासीत केले आहे.

लवकरच या प्रकल्पास सर्व संविधानिक मान्यता घेवून प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे वतीने देवेंद्र फडणवीस व मोहन यादव यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे आहे.

गोंदिया जिल्ह्यात डांगुर्ली बॅरेजचे काम हाती घेणे.

सदर आंतरराज्य बॅरेजचे काम हाती घेण्यास तत्त्वत: सहमती आजच्या बैठकीत झाली व तांत्रिक बाबीवर अधिकारी स्तरावर पुढील कार्यवाही करून पुढील आगामी बैठकीत अंतिम मान्यता देण्यात येईल असा निर्णय झाला.

बाग नदीवर विअर बांधणे.

राजेगाव-काटी उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने जानेवारी ते मे महिन्यात सुद्धा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी बाग नदीवर विअर बांधणे आवश्यक आहे. बॅरेजचे बुडीत क्षेत्र नदीपात्रातच असल्याने सदर बंधाऱ्याचे काम हाती घेण्यास दोन्ही राज्यांची सहमती प्रदान करण्यात आली.

लोह‌घोग्री – तोतलाडोह पाणी वळण योजना.

नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सध्या पेंच प्रकल्पातून १९० दलघमी पाणी आरक्षित आहे. तथापि नागपूर शहराची गरज भविष्यात ४४७ दलघमी एवढी असणार आहे. त्यामुळे नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी पर्याय गरजेचे आहे.त्या नुसार कन्हान नदीवर वळण बंधारा बांधून तेथून ६२ किमी लांबीचा Tunnel बांधून १० TMC पाणी तोतलागेह जताशयात वळविणे प्रस्तावित आहे. सदर योजनेस दोन्ही राज्यांनी तत्त्वत: सहमती दिली. दरम्यान तांत्रिक अधिकाऱ्यांनी सविस्तर अभ्यास करून आगामी बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात निश्चित झाले.

आगामी बैठक साधारणतः ऑक्टोबर २०२५ पूर्वी आयोजित करून सदर प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *