पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार
मुंबई, दि. १४ : इंधनटंचाईमुळे राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. यामुळे हजारो कामगारांना सक्तीने घरी बसावे लागत आहे. राज्याच्या तिजोरीत महत्त्वाची भर घालणारा मद्यनिर्मिती उद्योगही येत्या १५ दिवसांत इंधन टंचाईमुळे बंद ठेवावा लागण्याची शक्यता दिसत आहे.
मद्यनिर्मितीमध्ये काचेच्या बाटल्या आणि ॲल्युमिनियम कॅन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गॅसचा वापर होतो. प्रत्येक कंपन्यांचा आकार हा वेगळा असतो. हा आकार देण्यासाठी जो हायफ्लेम गॅस लागतो, त्याचा तुटवडा झाल्यास मद्यनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मद्य निर्मिती कंपन्या आहेत. मद्यासाठी लागणाऱ्या कॅन, बाटल्यांचा साठा संपत आला आहे. मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे केवळ पंधराच दिवसांचा साठा उरला आहे. यामुळे जिल्ह्यातील मद्य उद्योगाचे 200 कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची भिती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
युद्ध थांबले तरी मद्यनिर्मीती करणाऱ्या कंपन्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. युद्ध थांबल्यानंतरही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मोठ्या मद्यनिर्मिती कंपन्या आहेत. याचा मद्यनिर्मितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील मद्यनिर्मितीतून राज्याला हजारो कोटींचा महसूल प्राप्त होतो.
अनेक नामांकित व्हिस्की तसेच बियर कंपन्यांचे उत्पादन वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतींमध्ये होते. मध्यपूर्व देशांमध्ये एबीडी, रॅडिको कंपनीच्या साधारण 50 कंटेनरद्वारे मद्यपुरवठा होतो. युद्धामुळे मात्र, यापैकी जवळपास 40 कंटेनरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. कंपन्यांना याबाबत सांगण्यात आले आहे. यापैकी आधीच जेएनपीटी बंदरावर पोहोचलेले पाच ते सहा कंटेनर तेथेच अडकून पडले आहेत.
SL/SL/ML