शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्राचे परवाने होणार रद्द
धाराशिव, दि. १६ : सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका युवकाने नर्तिकेच्या वेडापायी आणि तणावात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गत आठवड्यात घडला होता. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. तसेच, सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली अवैध धंदे आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या कला केंद्रांवर कारवाई करा, ते बंद करा, असे निर्देशच त्यांनी दिले आहेत.
कला केंद्राच्या नावाखाली इतर धंदे नको, ज्य कला केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली वेश्या-व्यवसाय किंवा शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल, अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा, असे निर्देशच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पारगाव कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणावर भाष्य केलं.
कला केंद्राच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल तर अशी सगळी कला केंद्र बंद करा. लोककला जिवंत राहिली पाहिजे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, त्याच्या नावाखाली इतर धंदे नको, अशा शब्दात पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून धाराशिव जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.