ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुणे, दि १९ : बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.गेल्या सतरा वर्षांपासून या वास्तूचा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने ह्या वर्षी 57 वा वर्धापन दिन दिनांक 24 जून ते 26 जून 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध कला प्रकारातील कलाविष्कार सादर होणार आहेत. अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक 24 जून 2025 रोजी मा. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक) यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्याच वेळी संगीत नाटक विभाग,गद्य नाटक विभाग,तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान बालगंधर्व गौरव पुरस्कार प्रदान करून होणार आहे.या महोत्सवात अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र),आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र), चंद्रकांत दादा पाटील (उच्च शिक्षण व तंत्रज्ञ मंत्री),खासदार डॉ. अमोल कोल्हे,प्रशांत दामले (अध्यक्ष अ.भा मराठी नाट्य परिषद) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डॉ. अमोल कोल्हे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अभिनय बेर्डे, देवयानी बेंद्रे, नम्रता दास, पूजा पुरी हे नामवंत कलाकार देखील आपले योगदान देणार आहेत.
या महोत्सवाची सुरुवात दिनांक 24 जून 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता. अंजली राऊत (नागपूर) यांच्या गणेश वंदनेने होणार आहे. संगीत नाट्यप्रवेश, कविवर्य सुरेश भट यांच्या गजलांचा कार्यक्रम, “शब्दप्रभू जगदीश खेबुडकर”यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. संध्याकाळी व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र होणार आहे, ज्यामध्ये विशेष आमंत्रित जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आहेत.
दुसऱ्या दिवशी दिनांक 25 जून रोजी सकाळी एकपात्री तसेच कलावंतांच्या दहावी / बारावी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर फक्त “महिलांसाठी लावणी महोत्सव” होणार आहे. त्यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद उपस्थित आहेत.
“स्त्री आज कितपत सुरक्षित”या ज्वलंत विषयावर चर्चासत्र संध्याकाळी होणार आहे. ज्यामध्ये सहभाग अंजली दमानिया, दिपाली सय्यद, रूपाली चाकणकर, तृप्ती देसाई, होणार असून मुलाखतकार नम्रता वागळे या आहेत. संध्याकाळी लोक संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
तिसऱ्या दिवशी दिनांक 26 जून रोजी”महाराष्ट्राची लोकधारा”, दुपारी “मोगरा फुलला” हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री”ऑल इज वेल” या चित्रपटातील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा होणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध हास्य कलाकार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव हे देखील कलाविष्कार करणार आहेत.
तीनही रात्री संगीत रजनी, मनीषा लताड, कोल्हापूरचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स आणि मुकेश देढिया / तेजस्विनी प्रस्तुत बॉलीवूड हिट्स”सादर होणार आहे.KK/ML/MS