लावणी मूक झाली

 लावणी मूक झाली

मुंबई,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खर्जातील आवाज आणि ठसकेबाज सादरीकरणाने लावणी गायनामध्ये नावलौकिक कमावलेल्या लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाण (९२) यांचे आज मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर  मुंबईच्या मरीन लाईन्स इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुझ्या उसाला लागेल कोल्हा…, पाडाला पिकलाय आंबा, फड साभांळ तुऱ्याला गं आला, मला म्हणत्यात पुण्याची मैना, पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, कसं काय पाटील बरं हाय का? अशा त्यांनी गायलेल्या अनेक लावण्या लोकप्रिय ठरल्या.  मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेल्या लावण्यांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली.  त्यांना  आचार्य अत्रे यांच्याकडून ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब मिळाला.

आचार्य अत्रे यांचा हीच माझी लक्ष्मी हा त्यांनी  पार्श्वगायन केलेला पहिला मराठी चित्रपट. त्यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीतेही  गायिली आहेत.

या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सुलोचना चव्हाण यांना गंगा-जमना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे सन २००९ चा राम कदम पुरस्कार, सन २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

SL/KA/SL

10 Dec. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *