सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

नवी मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, शासनाने २६ नोव्हेंबर पासून वर्षभरासाठी “घर घर संविधान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश
भारतीय संविधानातील मूल्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांची जाणीव निर्माण करणे आणि नागरिकांच्या कर्तव्यांबाबत जागरूकता वाढवणे आहे, असे मत मुंबई समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी व्यक्त केले .
भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर पासून “घर घर संविधान” हा उपक्रम वर्षभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने मुंबई विभागात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, कार्यालय कोकण भवन येथे सकाळी ११ वाजता संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले . यावेळी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर व उपनगर या कार्यालयामार्फत संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली बी.आय.टी चाळ परेल ते दादर चैत्यभूमी यादरम्यान आयोजित करण्यात आली होती. या रॅली मध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले होते.
प्रसाद खैरनार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, श्रीमती उज्वला सपकाळे, इ. अधिकारी व कर्मचारी या उपक्रमास उपस्थितीत होते. सुमारे ५०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थीनी उपस्थित होते.सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी या कार्यालयामार्फत जिल्हा विधीसेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त कुवारबांव येथील शासकीय वसतिगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व विषद करण्यात आले. या कार्यक्रमास माणिकराव सातव, सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, दिपक घाटे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी इ. मान्यवर उपस्थित होते.
तसेच मुंबई विभागात समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे व रायगड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग, पांडुरंग वाबळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्हयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
SW/ML/SL
27 Nov. 2024