लाल बहादूर शास्त्री स्मृतिदिन: भारतासाठी एक दुखरी जखम

 लाल बहादूर शास्त्री स्मृतिदिन: भारतासाठी एक दुखरी जखम

राधिका अघोर

” प्रत्येक देशाच्या इतिहासात,कधी ना कधी अशी वेळ येते, ज्यावेळी, त्या देशाला समोरच्या दोन मार्गापैकी एका मार्गाची निवड करावी लागते. मात्र, आपल्या देशात आपल्याला अशी कुठलीही अडचण नाही, काहीही संभ्रम नाही. आपल्याला उजव्या किंवा डाव्या अशा कोणत्याही मार्गाकडे बघायचं नाही. आपला मार्ग सरळ आणि स्वच्छ आहे- एका समाजवादी लोकशाही राष्ट्राची उभारणी, ज्यात सर्वांना स्वातंत्र्य आणि समृद्धीचा मार्ग उपलब्ध असेल.. जगभरात शांतता प्रस्थापित करण्यात, इतर सर्व देशांशी मैत्री करण्यात पुढाकार घेणारा देश आपल्याला घडवायचा आहे.”

स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यावर देशाला उद्देशून केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात हे विचार मांडले होते. त्यांचे हे विचार आजही तेवढेच प्रासंगिक आहेत; इतकेच नाही, तर आजही देश त्याच मार्गाने वाटचाल करतो आहे. यातच ह्या अत्यंत साध्या भूमिपुत्राचे द्रष्टेपण आपल्याला दिसते.
अत्यंत अल्पकाळ आणि कठीण परिस्थितीत पंतप्रधान पद सांभाळावे लागलेल्या लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्या काळात दोन अत्यंत महत्वाच्या संकटातून देशाला बाहेर काढले. पहिले संकट भीषण अन्न टंचाईचे. देशात अपडलेल दुष्काळ, त्याच काळात झालेले 1962 चे भारत चीन युद्ध यामुळे देशाला मोठ्या अन्न टंचाईचा सामना करावा लागला होता.

त्यावर पहिला उपाय म्हणजे असलेल्या अन्नधान्याची बचत करुन ते अन्न गरिबांपर्यंत पोहोचवणे. त्यासाठी शास्त्रीजीनी जनतेला सोमवारचा उपास करण्याचे आवाहन केले. आणि त्यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबासह हा उपास सुरू केला. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी घरी त्रा तर उपास केलाच, पण त्यावेळी देशभरातले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स देखील सोमवारी संध्याकाळी बंद राहत. त्या उपासाला ‘ शास्त्री व्रत ‘ असेच नाव पडले होते.

देशाच्या नेत्याची कटिबध्दता, विश्वासार्हता जर इतकी उच्च कोटीची असेल, तर उभा देश त्याच्या पाठीशी उभा राहतो, याचं हे सर्वोत्तम उदाहरण होतं.
शेतकऱ्यांना त्यांनी अधिकाधिक अन्नधान्य उत्पादन घेण्याचे आवाहन केले. त्याची सुरुवातही त्यांनी दिल्लीतल्या आपल्या निवास स्थानी स्वतः शेत नांगरून बियाणे पेरत केली.

पण ह्या तत्कालिक उपाययोजना करून ते थांबले नाहीत, पुढे अन्नधान्य स्वयंपूर्णताआणण्यासाठी त्यांनी भारतीय अन्न महामंडळाची स्थापना केली. भारताच्या अन्न उत्पादनाला चालना देण्याची गरज अधोरेखित करताना, शास्त्री यांनी 1965 मध्ये भारतातील हरित क्रांतीलाही प्रोत्साहन दिले.

देशात सहकारी दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी श्वेतक्रांतीची सुरुवात केली. या अंतर्गत, त्यांनी गुजरातच्या आनंद इथं सुरु झालेल्या अमूल दुग्ध सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिलं. ही चळवळ देशव्यापी करण्याचा आपला मानस त्यांनी त्यावेळी बोलून दाखवले. आणि त्यातूनच, राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना झाली.

दुसरे त्यांचे मोठे कार्य म्हणजे, 1965 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या 22 दिवसांच्या युद्धात भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेला विजय. 1965 चे युद्ध आपल्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी लढले गेले.
1965 मध्ये पाकिस्तान
सोबतच्या युद्धविरामानंतर, शास्त्री आणि अयुब खान यांनी ताश्कंदमधे अलेक्सी कोसिगिन यांनी आयोजित केलेल्या शिखर परिषदेला हजेरी लावली होती. 10 जानेवारी 1966 रोजी, शास्त्री आणि अयुब खान यांनी ताश्कंद जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली ज्याने औपचारिक रित्या युद्ध समाप्त केले गेले.

या कारारातील जवळपास सर्व अटी, शास्त्रीजीनी वाटाघाटीनंतर मंजूर केल्या, मात्र जिंकलेली भूमी पाकिस्तानला परत देण्याची अट त्यांना मान्य नव्हती.असं म्हणतात की प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावामुळे शास्त्रीजीना त्यावर सही करावी लागली. मात्र, त्याच रात्री, त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. शास्त्री कुटुंबासह अनेकांचा असा आरोप होता, की त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर विषप्रयोग किंवा इतर काही कारणाने त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, दुर्दैवाने ह्या घटनेची सखोल चौकशी कधीही झाली नाही. आणि जी झाली, त्याची कागदपत्रे आज उपलब्ध नाहीत. ताशकंद मध्ये नेमके काय झाले, हे आजही कोणालाच माहीत नाही. आज इतक्या वर्षांनी कदाचित याचा तपास करणे अशक्य ठरेल, याची ठसठसती जखम मात्र, प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम राहील.

भारताचे दुसरे पंतप्रधान, शेतकरी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक लाल बहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन, खरंतर भारतासाठी एखाद्या दुखऱ्या जखमेसारखा दिवस आहे. स्वतंत्र भारताला पाकिस्तानसोबतच्या युद्धात विजय मिळवून देणाऱ्या, अत्यंत विपरीत परिस्थितीत देशाला आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा, भूमीशी जोडलेला एक अत्यंत मौल्यवान नेता भारताने, आजाच्याच दिवशी म्हणजे, 11 जानेवारी 1966 रोजी गमावला..

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *