तुळजापूरात सुरू होणार कौशल्य विद्यापीठ

धाराशिव, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या काळात धाराशिव जिल्ह्यात अपारंपारिक ऊर्जा, टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादन, कृषिपुरक उद्योग त्यासोबतच पर्यटन वाढीला मोठा वाव मिळणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळही लागणार आहे. जिल्ह्यातील होतकरू आणि गरजू तरुणांना जिल्ह्यासह राज्य आणि देशात सहज रोजगार मिळावेत यासाठी तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यापीठाच्या सहकार्याने यासह पुढील महिनाभरात जावा सारखे महत्वपूर्ण आणि अल्पमुदतीचे, रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
कौशल्य विद्यापीठ हे उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण निर्माण करण्यासाठी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण, स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन, नोकरीवर आधारित प्रशिक्षण, याला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष विद्यापीठ असणार आहे. त्यातून प्लेसमेंटही मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रशिक्षणानंतर, मूल्यांकन यंत्रणेमार्फत मूल्यांकन करून पात्र तरुणांना हक्काचा रोजगार मिळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ आणि तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात लवकरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल तसेच ‘जावा’ सारख्या कमी कालावधीच्या व लगेच नोकरी मिळेल अशा कोर्सची लगेच सुरुवात केली जाईल. त्यानंतर सिम्बायोसिसचे अनुभवी आणि तज्ञांचे पथक धाराशिव जिल्ह्यातील एकूण भौगोलिक परिस्थिती, जिल्ह्यातील शेती आणि त्यावर आधारित शेतीपूरक उद्योग आदी बाबींची सखोल माहिती घेऊन कृषी-व्यवसाय, पर्यटन आणि अपारंपारिक ऊर्जा सारखे डिप्लोमा/ प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यास मदत करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
SL/ML/SL
22 Jan. 2025