कातळशिल्पांच्या अभ्यासातून तत्कालीन मानवी संस्कृतीचा उलगडा शक्य

जोधपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात लागलेले अश्मयुगीन कातळशिल्पांचे शोध पुरातत्वदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून त्याच्या अभ्यासाद्वारे या प्रदेशातील तत्कालीन मानवी संस्कृतीचा उलगडा होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. के. एल. माथुर यांनी नुकतेच केले.
राजस्थानमधील जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठात झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत सिंधुदुर्गातील कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी परिषदेच्या तांत्रिक सत्रात ‘कोकणातील कातळशिल्पे’ या विषयावर शोधनिबंध वाचून सादरीकरण केले. प्रा. डॉ. माथुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्राच्या सहअध्यक्षपदी डॉ. नीतिन गोयल होते.
परिषदेचे उद्घाटन मारवाडचे महाराजा गजसिंहजी यांच्याहस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (आयसीएचआर) सहकार्याने ही परिषद ‘आर्किओलॉजी अँड एपिग्राफी सोसायटी’ने आयोजित केली होती. कुलगुरु प्रा. डॉ. के. एल. श्रीवास्तव, ज्येष्ठ इतिहासकार प्रा. डॉ. आर. सी. ठाकरान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा. आर. पी. बहुगुणा, सोसायटीचे अध्यक्ष प्रा. बी. एल. भादानी, सचिव राजेंदर कुमार, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुशिला शक्तावत, संयोजक प्रा. डॉ. भगवान सिंह शेखावत, यावेळी उपस्थित होते.
लळीत यांच्या अत्यंत प्रभावी आणि सविस्तर सादरीकरणानंतर प्रश्नोत्तरे तसेच शंका समाधान झाले. याचा आढावा घेताना डॉ. माथुर म्हणाले की, देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळलेली ही पेट्रोग्लिफ्स (कातळशिल्पे) अद्भूत असुन थक्क करणारी आहेत. अद्यापपर्यंत दृष्टीआड असलेला हा पुरातन मानवी वारसा जगासमोर आणून अभ्यासकांनी मोठी कामगिरी बजावली आहे. भारतीय पुरातत्वाच्यादृष्टीने हा अनमोल शोध आहे. या कातळशिल्पांचे अजून सखोल संशोधन झाल्यास केवळ किनारपट्टीच नव्हे, तर आपल्या देशाच्या इतिहासपूर्व काळावर आणि मानवी प्रगतीवर प्रकाश पडणार आहे. शासनाने या ठिकाणांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
या दोन दिवसांच्या परिषदेच्या अध्यक्षपदी असलेले दिल्ली विश्वविद्यालयाच्या इतिहास विभागाचे निवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ इतिहासकार प्रा. डॉ. आर. सी. ठाकरान यांनी या शोधनिबंधावर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की,महाराष्ट्राच्या किनारी भागात सापडलेली ही कातळशिल्पे प्रागइतिहासाचा अमूल्य दुवा आहे. त्यातील रचनावैविध्य, कलाकारी आणि सूचकता अतिशय उच्च दर्जाची आहे. त्या काळात या प्रदेशात वावरणा-या मनुष्यसमाजाची संस्कृती आणि अभिरुची आश्चर्यकारक आहे. या कलाकृतींचे जतन, संशोधन आणि प्रसार आवश्यक आहे.
जतनात लोकसहभाग हवा
याच परिषदेत झालेल्या ‘पुरातन वारसा आणि सामान्य नागरिक यांचा संबंध’ या परिसंवादात सतीश लळीत यांना सहभागी करण्यात आले होते. या परिसंवादात लळीत म्हणाले की, आपल्या पुरातन वारशाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी आणि त्यांच्यात पुरातत्वीय भान येण्यासाठी लोकसहभागी पुरातत्वशास्त्र (पब्लिक पार्टिसिपेटरी आर्किओलॉजी) विकसित होण्याची गरज आहे. विद्यार्थीवयात आपल्या वारशाबाबत भान यावे, जाणीवजागृती व्हावी, यासाठी किमान माध्यमिक स्तरावर या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात झाला पाहिजे.
नियमित विषय म्हणून नव्हे, पण या विषयावरचे तज्ञ बोलावून त्यांची व्याख्याने अधूनमधून आयोजित केली पाहिजेत. गावातील किंवा पंचक्रोशीतील अशा ठिकाणांना भेटी ठेवल्या पाहिजेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या वारशाबाबत आस्था निर्माण होईल. प्रत्येक वारसास्थळाचे जतन सरकारनेच केले पाहिजे, असे म्हणून चालणार नाही. शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, युवक मंडळे, ग्रामपंचायती यांनी आपल्या स्तरावर वारसास्थळे जतनाचे काम केले पाहिजे. पुढील पिढ्यांना दाखविण्यासाठी आपला वारसा शिल्लक ठेवायचा असेल तर ही पावले तातडीने उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सतीश लळीत केले.
या परिसंवादात प्रसिद्ध इतिहासकार डॉ. श्रीमती रिमा हुजा, डॉ. जे. एस. खरकवाल, डॉ. सुनील लोहार, डॉ. एम. एस. तनवर यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या बृहस्पती भवन या सभागृहात झालेल्या या परिषदेत देशाच्या विविध राज्यातील पुरातत्वज्ञ, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध सादर केले. परिषदेला साडेतीनशेहून अधिक उपस्थिती होती. परिषदेच्या समारोप समारंभाला केंद्रीय जलसंसाधन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सादरीकरणानंतर अनेकांनी लळीत यांना भेटून उत्तम सादरीकरणाबद्दल अभिनंदन केले तसेच कोकणात भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. जोधपूर परिषदेत दिवसभर कातळशिल्पांचा बोलबाला राहिला.
ML/KA/PGB 13 Oct 2023