17 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
मुंबई, दि. 28 : एकेकाळी जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या नोकियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी जगभरात तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असून याचा थेट परिणाम भारतावरही होणार आहे. भारत नोकियासाठी महत्त्वाचा बाजार असून येथे 17 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. जागतिक कपातीमुळे अनेक भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे.
कंपनीची भारतातील विक्री गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. 2025 च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ विक्री 15% घटून 4290 कोटी रुपयांवर आली, जी गेल्या वर्षी जवळपास 5000 कोटी होती. या घसरणीमुळे खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात अपरिहार्य ठरली आहे.
याशिवाय, कंपनीने भारतातील नेतृत्वातही बदल केले आहेत. 1 एप्रिल 2026 पासून समर मित्तल यांची इंडिया कंट्री बिझनेस लीडर तर विभा मेहरा यांची इंडिया कंट्री मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वीचे इंडिया हेड तरुण छाबडा यांनी पद सोडले.
SL/ML/SL