विनयभंगाची तक्रार दाखल होताच जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा जाहीर
ठाणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड NCP MLA Jitendra Awad यांच्या वर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनय भंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यातून हा वाद चिघळला आहे, आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत आव्हाड यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे.
काल ठाणे आणि मुंब्रा इथे उड्डाण पुलांच्या उद्घाटन कार्यक्रमात आव्हाड यांनी आपल्याला धक्काबुक्की केली,त्यात आपला विनयभंग झाल्याची तक्रार या महिलेने केल्यावर मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला.
आज सकाळी याच महिलेविरोधात तक्रार करायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तक्रार पोलिसांनी न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ता रोखला आणि मुंब्र्यातील रिक्षा बंद केल्या , यामुळे कामावर निघालेल्या जनतेचे हाल झाले.
गेल्या ७२ तासात आपल्यावर दोन गुन्हे दाखल करून गलिच्छ राजकारण खेळले जात आहे , ते आपण सहन करू शकत नाही असे सांगत आमदारकीचा राजीनामा देण्याचे आव्हाड यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान महा विकास आघाडीच्या खासदार, आमदार महिलांचे शिष्टमंडळ यासाठी राज्यपालांना भेटले आणि त्यांनी याबाबत सरकारच्या हस्तक्षेपाची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी केली.
ML/KA/PGB
14 Nov .2022