जरांगे यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी

सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले आहेत. शरद पवारांची पूर्वीसारखी सार्वत्रिक इमेज राहिली नसून ते फक्त मराठ्यांचेच नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा बनली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील आंदोलन करत होते हे आता क्लिअर झालं आहे, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.
लोकसभेपेक्षा विधानसभेची स्थिती वेगळी बनली आहे. लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतदारांनी इंडिया आघाडी म्हणजेच राज्यातील महाविकास आघाडीला मतदान केलं होते. मात्र महाविकास आघाडी ही सत्तेतील प्रतिनिधित्व देत नसल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार नाहीत, असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याचा प्रयत्न करत होते, पण सामान्य जनतेनेच दंगल होवू नये असं ठरवले म्हणून दंगल झाल्या नाहीत. धर्माच्या नावावर राजकरण करणाऱ्यांना लोक नाकारत आहेत
ML/ML/PGB
27 Sep 2024