दुष्काळग्रस्त भागात केली जांभूळाची शेती.परिश्रमाला आली गोड फळे…

जालना, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना हा नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात पारंपरिक पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.कधी पाऊस न पडल्याने,कधी खूप पावसाने तर अवकाळी मुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने जालना जिल्ह्यातल्या शेतकरी पिचून गेला आहे.पण याही परिस्थितीशी लढा देत काही शेतकरी निकराने शेती करीत आहे.पारंपरिक शेती सोबत आधुनिक शेतीचा त्यातही हटके शेती प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवित आहेत.
जालना जिल्ह्यात सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोसंबी च्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यानंतर रेशीम शेती करण्यामागे शेतकरी लागले आणि लाखोने उत्पन्न कमवीत आहेत.त्यामुळे पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आणि निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता जालना जिल्ह्यातील आलमगाव येथील शेतकरी प्रल्हाद येलेकर यांनी त्यांच्या २ एकर बागेमध्ये जांभूळ शेतीचा प्रयोग केला.त्यांची एकूण २० एकर शेती.त्यापैकी २ एकर मध्ये त्यांनी कोकण विद्यापीठाच्या कोकण बहाडोली या जातीचे ३०० जांभळाची रोपे आणून लावली ते वर्ष होते २०१४ चे.
२ एकर मध्ये १५ बाय १६ अंतरावर ३०० झाडांची लागवड केली,त्याचा फायदा असा झाला की या २ एकर क्षेत्रात त्यांना आंतरपीक देखील घेता आले.३०० रोप पालघर येथून घरी आणेपर्यंत त्यांना १ लाख रुपयांचा खर्च आला होता.त्यांनी गेली ७ वर्ष जांभळाच्या रोपांना जीवापाड जपले शिवाय त्यात आंतरपीक सोयाबीन घेतले त्यातून त्यांना दरवर्षी १२ ते १३ क्विंटल सोयाबीन चे उत्पन्न व्हायचे त्यामुळे त्यातूनच त्यांचा जांभूळ शेती साठी लागलेला खर्च निघून गेला.७ वर्षानंतर जांभळाच्या झाडांना बहार आला आणि गेल्या दोन वर्षापासून त्यांना जांभूळ शेतीमधून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.उत्पन्न मिळवण्याचे हे त्यांचे तिसरे वर्ष आहे.पहिल्या वर्षी त्यांना कमी बहार असल्यामुळे दीड लाख रुपयांचे उत्पन्न झाले होते.
मागील वर्षी मात्र बहार चांगला आल्याने आणि बाजारपेठेने चांगली साथ दिल्याने तब्बल २ ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न झाले होते. यावर्षी देखील बहार जोरदार आलेला आहे. त्यातच बाजारामध्ये जांभळाचा भाव २२० ते २४० रुपये किलो प्रमाणे मिळत असून यंदा जांभळाला आलेल्या मोठ्या प्रमाणातल्या बहारातून त्यांना ४ ते ५ टन जांभळाचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.यामधून त्यांना किमान ७ ते साडेसात लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न होणार असल्याचे ते सांगतात.ज्या काळात शेतकरी पेरणी साठी पैशाची व्यवस्था करण्यात गुंतलेले असतात त्या काळात म्हणजे एन जून मध्ये जांभूळ विक्रीसाठी तयार असते त्यामुळे पैशाची चणचण भासत नाही.त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी असा मार्ग निवडल्यास चांगले उत्पन्न कमावता येईल असा विश्वास ते व्यक्त करतात.
मराठवाडा,त्यातही जालना जिल्हा नेहमी दुष्काळाच्या चक्रात अडकलेला असतो.शेती चा व्यवसाय आतबट्याचा होतोय म्हणून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.पण अश्या काही शेतकऱ्यांची उत्पन्न कमावण्याची जिद्द बघितली की प्रयोगशीलतेतून शेती खूप चांगले उत्पन्न देते हे या शेतकऱ्याच्या प्रयोगातून सिद्ध होते. प्रल्हाद येलेकर यांची सध्या जागेवर जांभूळ विक्री सुरू असून गेल्या १५ दिवसात त्यांना २ लाखापेक्षा जास्त उत्पन्न झाले आहे.सध्या झाडावर ४ ते ५ टन इतका माल असून परिसरातील व्यापारी,ग्राहक त्यांच्या जांभळाची चव घेऊन संतुष्ट होत आहे.
ML/KA/SL
10 July 2023