जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबई महानगराची हॅट्ट्रीक

 जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबई महानगराची हॅट्ट्रीक

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक क्षेत्रांमध्ये सतत अग्रेसर असलेल्या मुंबई महानगराने पर्यावरण संतुलनासाठीही वेगवेगळे उपक्रम राबवित जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई सदा हरित राहावी, येथील हवा शुद्ध राहावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने वृक्षलागवड आणि संवर्धनावर भर दिल्याचे फलित म्हणून मुंबईने सलग तिसऱ्या वर्षी (२०२३) ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार पटकावला आहे. जगभरातील हरित शहरांच्या यादीत आपले स्थान बळकट केल्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ‘जागतिक वृक्ष नगरी’चे मानपत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले. आर्बर डे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी डॅन लॅम्बे व अन्न आणि कृषी संघटनेच्या वने विभागाचे सहायक संचालक हिरोटो मित्सुगी यांच्या स्वाक्षरीनिशी या बहुमानाचे प्रमाणपत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) ही संस्था जगभरात अन्नाची टंचाई कमी करणे तसेच भूकबळींचे प्रमाण रोखणे या उद्दिष्टासाठी कार्यरत आहे. तसेच मागील सुमारे ५१ वर्षांहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या आर्बर डे फाउंडेशन या अमेरिका स्थित संस्थेने वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी केली आहे. सन २०२७ पर्यंत जगभरात मिळून ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे या फाउंडेशनचे ध्येय आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून वृक्ष संवर्धन व नागरी वनीकरण यास चालना दिली आहे. या योगदानामुळे मुंबईने सलग तिसऱ्यांदा (सन २०२३) हा बहुमान पटकावला आहे. मुंबई महानगरात सध्या २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. तसेच मागील काही वर्षात नागरी वनीकरण (जपानी मियावाकी) पद्धतीने ५ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत.

 अशी होते शहरांची निवड-

जगभरात वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीचे ध्येय उराशी बाळगून अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशन या दोन्ही संस्था सन २०१९ मध्ये एकत्र आल्या. त्यांनी जगभरात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱया शहरांचा गौरव करण्याची मोहीम हाती घेतली. जगभरात वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल या संस्था घेतात. त्यानंतर विविध निकषांवर पात्र ठरणाऱया शहरांची जागतिक वृक्षनगरी यादी घोषित करून त्यांना गौरविण्यात येते. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ पासून हा बहुमान सुरू करण्यात आला आहे. मुंबईने सन २०२१, २०२२ आणि सन २०२३ अशी सलग तीन वर्षे ’जागतिक वृक्ष नगरी’ (Tree Cities of The World) हा बहुमान पटकावला आहे.

या पाच मानांकनांची मुंबईने केली पूर्तता-
झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्ष उत्सव आयोजित करणे, अशी पाच मानांकनाची मुंबईने पूर्तता केली आहे. सलग तिसऱयांदा मुंबई महानगराची जागतिक वृक्ष नगरी बहुमानासाठी निवड होणे, ही बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी देखील अभिमानाची बाब आहे.

ML/ML/PGB
23 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *