भारत पाक संघर्षामुळे IPL अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. “देश युद्धात असताना क्रिकेट सामने सुरु ठेवणे योग्य दिसत नाही,” असे BCCI च्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. त्यांनी २५ मे रोजी कोलकाता येथे संपणारी IPL आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचेही सांगितले.
जम्मू आणि पठाणकोट या शेजारच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे धर्मशाळेत गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्यंतरी रद्द करण्यात आल्यानंतर या सिरिजवर अनिश्चिततेचे ढग दाटून आले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात परतण्यास सांगण्यात आले आहे. नवीन तारखा जाहीर झाल्यावर त्यांना कळवले जाईल. सध्या आयपीएलमध्ये १२ लीग सामने आणि ४ प्लेऑफ सामने शिल्लक आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. आता नवीन वेळापत्रक एका आठवड्यानंतर जाहीर केले जाईल.