बांधकाम कामगारांच्या जेवण आणि साहित्य यातील भ्रष्टाचाराची चौकशी
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिलं जाणारं मध्यान्ह भोजन आणि त्यांना दिलं जाणारं सुरक्षा साहित्य यांच्या वाटपात तसेच दर्जाबाबत असलेल्या तक्रारींवर कामगार आयुक्तांच्या मार्फत उच्च स्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत केली.
याबाबतचा मूळ प्रश्न कैलास घाडगे पाटील यांनी उपस्थित केला होता, त्यावर नाना पटोले , विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अतुल भातखळकर , राजेश टोपे आदींनी उपप्रश्र्न विचारले , त्यात कामगारांना निकषानुसार जेवण दिलं जात नाही, त्यांना दिलेलं सुरक्षा साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे असे त्यांचे आरोप होते.
राज्यात आता २६ लाख ३८ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत . करोना काळात केवळ नोंदणीकृत नाही तर इतर बांधकाम कामगारांना ही माध्यान्न भोजन देण्यात आलं. आता मात्र एक जुलै पासून पुन्हा केवळ नोंदणीकृत कामगारांना च हे भोजन देण्यात येणार आहे.
राज्यातील बांधकाम कामगारांच्या अधिकाधिक नोंदणी साठी नोंदणी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे, केवळ एका रुपयात नोंदणी केली जाते, आता प्रत्येक तालुक्यात सेतू सुविधा केंद्रात त्यांची नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्र सुरू केली जातील असं ही मंत्री खाडे यांनी सांगितलं.
ML/KA/SL
24 July 2023