भारत,अशी ओळख करुन देत, G-20 परिषदेचे दिमाखदार उद्धाटन

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये G20 शिखर संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या मान्यवर राष्ट्रध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं. यावेळी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी करुन न देता ‘भारत’ अशी करुन दिली. उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान दिसलेल्या छायाचित्रांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान मोदींच्या समोर देशाचे नाव इंडिया नव्हे तर भारत असे लिहिले होते. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधानांच्या आसनासमोर देशाचे नाव INDIA न लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं आता देशाचं नाव इंडियावरुन भारत करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचचं मानलं जात आहे.
उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले , “G20 परिषदेत भारत सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. यावेळी ज्या ठिकाणी आपण एकत्रित आहोत इथून काही किमी अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा एक स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलंय की, मानवतेचं कल्याण आणि सुख हे कायम प्राथमिकता असायला पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश संपूर्ण विश्वाला दिला होता. या संदेशाची आठवण करुन आपण या जी २० संमेलनाला सुरुवात करुयात”
भारताची सर्वसमावेशकता मांडताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे. कोरोना महामारीवेळी जगावर मोठं संकट आले होते, त्यावेळी विश्वासाचा अभाव असल्याचे जाणवलं. पण अविश्वासाला आता विश्वासाने जिंकायचे आहे. आपण कोरोनाला हरवू शकतो, तर अविश्वासाच्या संकटालाही हरवू शकतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सर्वांनी मिळून ग्लोबल ट्रस्ट डेफिसिटला विश्वासात बदलूयात. सर्वांना सोबत घेऊन चालायची ही वेळ आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. भारताचे G20 अध्यक्षपद हे देशामध्ये आणि देशाबाहेर सर्वसमावेशाच्या सबका साथचे प्रतीक बनले आहे.
SL/KA/SL
9 Sept. 2023