जागतिक मधुमेह दिन : निरोगी, सकारात्मक जीवनशैली हाच उपाय

 जागतिक मधुमेह दिन : निरोगी, सकारात्मक जीवनशैली हाच उपाय

-राधिका अघोर

मधुमेह म्हणजेच डायबीटीस हा आजार आता कोणालाच नवा राहिलेला नाही. जवळपास प्रत्येक घरात एकतरी मधुमेही असतोच, इतका त्याचा आता प्रसार झाला आहे. आणि 1945 पर्यंत तर, जगातल्या प्रत्येक आठ व्यक्तीपैकी एकाला मधुमेह असेल, असं तज्ञांचं म्हणणं आहे. शरीरात जी साखर तयार होते, आहारातून घेतली जाते, तिचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम आपले स्वादुपिंड तयार करत असते. स्वादुपिंड (pancreas) जर नीट काम करू शकले नाही, त्याची कार्यक्षमता कमी झाली, तर ते इंसुलिन तयार करु शकत नाही, आणि मग रक्तातली साखर तशीच राहते. त्याचे विघटन होत नाही, कधीकधी इंसुलिन विघटन करण्याची शरीराची क्षमता नसते. अशा सगळ्या स्थितीत, आपल्या शरीरातली साखर रक्तात तशीच राहते, तिचे ऊर्जेत रूपांतर होत नाही. त्याला तेव्हा त्या व्यक्तीला मधुमेह झाला आहे, असे निदान होते.हा चयापचय क्रियेशी संबंधित एक आजार आहे, आणि तो साधारणपणे शरीरात कायम राहतो. ह्या आजाराचे प्रचंड वाढते प्रमाण बघून त्याविषयी जनजागृती करण्यासाठी, 1991 मध्ये पहिल्यांदा जागतिक मधुमेह दिनाची संकल्पना मांडली गेली.

2006 साली संयुक्त राष्ट्रांनी, मधुमेह हा जागतिक आजार असल्याचा, जागतिक आरोग्य संघटनेचा प्रस्ताव मान्य करत 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळण्याचा प्रस्ताव स्वीकार केला. इंसुलिन चा शोध लावणारे सर फ्रेडरिक बॅटिंग यांचा जन्मदिवस म्हणून 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन पाळला जातो. मधुमेहाचे तीन प्रकार असतात. टाईप-1 मधुमेह शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेच्या विकृतीमुळे, स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यानर होतो. टाईप-1 मधुमेहमध्ये आपलीच इम्यून सिस्टीम ही आपल्याच शरीरातील स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशीवर हल्ला करतात. त्यामुळे शरीरात योग्यप्रकारे इन्सुलिनची निर्मिती होत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. साधारण 10 टक्के रुग्ण हे ह्या प्रकारच्या मधुमेहाचे असतात.तसंच, टाईप-2 मधुमेहात शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखर पेशिंपर्यंत योग्यरीत्या जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते मधुमेह होतो. याचे प्रमाण खूप जास्त आहे. तिसऱ्या प्रकारात गरोदरपणात स्त्रियांना होणारा मधुमेह. हा काही काळासाठी असतो. लठ्ठपणा, बैठी, चुकीची जीवनशैली, आनुवंशिकता, अयोग्य आहार, अति खाणे, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव, अपुरी झोप अशा कारणांमुळे मधुमेह होऊ शकतो. ही सगळी कारणं आज आपल्या आयुष्याचाच भाग झाली आहेत. त्यामुळेच मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.

मधुमेह आपल्या किडन्या, पाय, डोळे, हृदय अशा अनेक अवायवांच्या आरोग्यावर परिणाम करु शकतो. मधुमेह आपल्या शरीरात छुप्या स्वरूपात असू शकतो त्यामुळे त्याची प्रत्येकवेळी लक्षणे दिसतीलचं असेही नाही. मधुमेहाची लक्षणे ही रक्तातील साखरेची चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. मात्र, काही लक्षणं, जसे वारंवार लघवीला जावे लागणे, वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे, अचानकपणे वजन घटणे, अधिक भूक लागणे, डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे, जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे, मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.आज भारतात दहा कोटी, दहा लाख लोकांना मधुमेह आहे, असे ताजी आकडेवारी सांगते, या आकडेवारीवरुन त्याची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्या लक्षात येईल. यंदाच्या मधुमेह दिनाची संकल्पना “ बंधने तोडणे, दरी कमी करणे” अशी आहे. सर्व मधुमेही रुग्णांना चांगले आयुष्य जगण्याचा हक्क आहे. मधुमेहाचे व्यवस्थापन करायला हवे. तरच, आपण त्याच्यासोबत जगू शकतो. मधुमेह होऊच नये, यासाठी आधी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिभेवर ताबा, उत्तम, निरोगी जीवनशैली, चांगला सकस आहार, व्यायाम, ताणतणाव विरहित आयुष्य, अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांचाच माहीत असतात. खरं तर, मधुमेहच नाही, कोणताही आजार होऊ नये, यासाठी अशी जीवनशैली उपयुक्त असते. हे सगळं कळतं, पण वळत नाही, अशी स्थिती आहे. आजार झाला, की किंवा pre diabetes अशा अवस्थेत बळजबरीने किंवा मनात भीती ठेवून उपाय करण्यापेक्षा, आधीच, अशीच निरोगी जीवनशैली स्वीकारली, तर मधुमेह टाळता येईल आणि गोळ्या, इंजेक्शन, आजार, अशा सगळ्या चक्रातून आपली सुटका होईल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *