जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिवस : शाश्वत जीवनशैलीकडे न्याय्य संक्रमण

राधिका अघोर
जागतिक हक्क संरक्षण दिन दरवर्षी 15 मार्च ला पाळला जातो. यंदाच्या वर्षाची संकल्पना ” शाश्वत जीवनशैलीकडे न्याय्य संक्रमण
अशी आहे. ग्राहकांच्या हितासाठी, त्यांची फसवणूक टाळण्यासाठी, ग्राहक संरक्षण चळवळ सुरू झाली. ग्राहकांच्या संरक्षणाचे कायदे अतिस्त्वात आले, मात्र, त्याविषयी अनेकांना माहितीच नसते. ह्या कायद्याविषयी लोकांना सांगणे, जनजागृती करणे आणि फसवणूक झालेल्या ग्राहकांना संरक्षण देणे, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
1960 साली, या संघटनेचा जागतिक महासंघ स्थापन झाला. या महासंघामुळे ग्राहकांच्या हितांचे रक्षण करणारा एक स्वायत्त आणि सक्षम मंच निर्माण झाला. 15 मार्च 1962 याच दिवशी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी युएस सिनेटमध्ये ग्राहक हक्काविषयी एक प्रभावी भाषण केले होते. त्या भाषणाचे स्मरण म्हणूनच, 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्राहकांचे फसवणुकीपासून संरक्षण, त्यांच्या अधिकारांची जाणीव आणि एक संघटित शक्ती म्हणून हा मंच कार्यरत असतो.
दरवर्षी एक विशिष्ट संकल्पना घेऊन हा दिवस साजरा केला जातो. आणि या संकल्पना केवळ व्यापारी, उद्योग कंपन्या किंवा विक्रेते यांच्यापासून ग्राहकांचे संरक्षण करण्याइतक्या मर्यादित नसतात, तर ग्राहकांचे माणूस म्हणून व्यापक आणि शाश्वत हित त्यातून जोपासले जाते. जसे की प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती. या निमित्त, ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन दिली जाते. फसवणूक झाल्यास दाद कुठे आणि कशी मागायची याचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जातात.
ग्राहकांच्या मूलभूत अधिकारात, त्यांनी दिलेल्या/खर्च केलेल्या पैशाच्या योग्य मूल्य प्रमाणात त्यांना उत्पादने/सेवा मिळण्याचा हक्क असतो, उत्पादने त्यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतील, याची हमी तसेच उत्पादने कुठेही धोकादायक करु शकणार असतील, तर त्याच्या धोक्याविषयीचा स्पष्ट इशारा, माहिती ग्राहकांना देणे उत्पादक/विक्रेत्यासाठी अनिवार्य असते. कोणत्या उत्पादन/सेवेची निवड करायची याचा संपूर्ण अधिकार ग्राहकाला असतो, त्यांना कोणीही कुठलीच बळजबरी किंवा धाक दाखवू शकत नाही. उत्पादन आणि सेवेविषयी संपूर्ण माहिती मिळणे, हा ग्राहकांचा अधिकार असतो, त्याची माहीती उत्पादकांना द्यावीच लागते, आणि ग्राहकांना आपले प्रतिनिधित्व करण्याचा/मांडण्याचा अधिकार असतो.
ग्राहक म्हणून जसे आपले अधिकार आहेत, तशाच काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत.
ग्राहक म्हणून आपण जागृत असायला हवं, आपण घेत असलेल्या उत्पादने/सेवांची संपूर्ण माहिती आपण वाचायला हवी, तसेच अधिकारांचा गैरवापर होणार नाही यासाठी नैतिकता पाळायला हवी. फसवणूक झाल्यास त्याविषयी बोलायला हवं आणि इतरांना जागृत करायला हवं. तसेच पर्यावरणाचं संरक्षण करावं.
आता बदलत्या परिस्थितीनुसार ग्राहकांचं व्यापक हित लक्षात घेऊन ग्राहक संरक्षणासाठीच्या संकल्पना ठरवल्या जातात. यंदाच्या दिनाची संकल्पना शाश्वत जीवनशैलीकडे न्याय्य संक्रमण अशी आहे. म्हणजे मूलभूत हक्कांच्या पलीकडे जात, आता सर्वांच्या सामाईक उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक अशा शाश्वत जीवनशैलीचा अधिकार सर्वांना मिळावा, ही व्यापक संकल्पना राबवली जात आहे.
आपल्या सर्वांना शाश्वत आयुष्य जगण्यासाठी जशी उत्पादने आणि सेवा हव्या असतात, त्या मिळवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.
भारतात, ग्राहकांच्या हितासाठी नवा ग्राहक संरक्षण कायदा, 2019 20 जुलै 2020 पासून लागू झाला.
या कायद्यानुसार ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देऊन ग्राहक संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ची स्थापना करण्यात आली आहे. सीसीपीएला ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे आणि तक्रारी / खटला चालवणे, असुरक्षित वस्तू आणि सेवा परत मागवणे, अन्यायकारक व्यापार पद्धती बंद करवणे तथा दिशाभूल करणार्या जाहिरातींवर दंड आकारणे असे अधिकार आहेत. तसेच बदलत्या काळानुसार, ऑनलाईन बाजारांचा यात समावेश करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत प्रत्यके ई-कॉमर्स घटकाला वस्तू परत केल्यास, परतावा, वस्तू बदलून घेतली असल्यास, वारंटी आणि गॅरंटी, वस्तूची डिलेव्हरी आणि शिपमेंट, देयकाचे प्रकार, तक्रार निवारण पद्धती, देयक प्रदान पद्धती, देयक पद्धतीची सुरक्षितता, परताव्यावरील शुल्क या सर्व बाबींची माहिती द्यावी लागणार आहे.
ग्राहकांना वस्तू घेतानाच तपशील समजून घेण्यासाठी वस्तू कोणत्या देशातील आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे. ते म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारीची पोहोच 48 तासांत द्यावी लागेल आणि या कायद्यानुसार पोहोच मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत तक्रारीचे निवारण करावे लागणार आहे.
ग्राहक म्हणजे आपण सर्व जण. दैनंदिन आर्थिक व्यवहारात अनेकदा आपल्यालाही फसवणूक किंवा समाधानकारक सेवा न मिळणे अशा त्रासाचा सामना करावा लागतो. अशावेळी गप्प न बसता किंवा कंटाळा न करता, आपण आपल्या आणि पर्यायाने सर्वच ग्राहकांच्या हितासाठी जागृत राहणे ही आपलीही जबाबदारी आहे.