शेतकऱ्यांना सव्वा दोन हजार कोटींचा विमा मंजूर

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पीकविमा योजनेचा लाभ दिला गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची अग्रीम वितरित केली जात आहे. एकूण २२१६ कोटींची अग्रीम राशी मंजूर करण्यात आली असून त्यापैकी आजतागायत १५१६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. उर्वरित ६०० कोटींचे वाटप सुरू आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याबाबतचा तारांकित प्रश्न अरुण लाड यांनी उपस्थीत केला. त्यावर कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितले की, १ कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यातील ५२ लाख शेतकरी नुकसान भरपाईला पात्र ठरले. त्यांना २२१६ कोटी अग्रीम मंजूर झाला. त्यातील आजपर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांना १७१६ कोटी वितरित करण्यात आले. उर्वरित १७ लाख शेतकऱ्यांना ६०० कोटींचे वाटप सुरू आहे.
ज्यावर पीक विमा कंपन्यानी आक्षेप नोंदविला, सरकार त्यांचे आक्षेप फेटाळत आहे. या योजनेतून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही शेतकऱ्यांना शुन्य नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथाही त्यांनी मांडली.
ML/KA/SL
11 Dec.2023