भारत उभारणार स्वतःचे “अंतराळ स्थानक”

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO च्या माध्यमातून भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. चांद्रयान, मंगळ यान, मिशन आदित्य यांच्या माध्यमातून भारताचे अवकाश संशोधनाचे क्षितिज अधिकाधीक विस्तारत आहे. परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबन कमी करून स्वदेशीच्या माध्यमातून जगभरातील अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण ISRO माध्यमातून होणार आहे. या कार्याला अधिक चालना देण्यासाठी भारत आता आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. याबाबत आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी महत्त्वाची घोषणा केली. ” भारत 2035 पर्यंत आपले अंतराळ स्थानक स्थापन करेल. त्याचे नाव ‘भारत अंतराळ स्थानक’ असे असेल. यासोबतच 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाठवण्याची योजना आहे, ” असे डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत डॉ. सिंह यांनी सांगितले की, 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहे. तसेच, भारत आपल्या खोल समुद्र मोहिमेअंतर्गत 6,000 मीटर खोलीवर मानव पाठवण्याची योजना आखत आहे.
ते म्हणाले, अंतराळ क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकार नवीन कायद्यावर काम करत आहे. गेल्या चार वर्षांत या क्षेत्रातील उपग्रहांच्या निर्मिती आणि प्रक्षेपणात खासगी कंपन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे या क्षेत्रात बरीच सुधारणा झाली आहे. 2014 मध्ये स्पेस स्टार्ट-अपची संख्या फक्त एक होती, ती आता 266 झाली आहे. ते म्हणाले की, भारताने आतापर्यंत श्रीहरिकोटा प्रक्षेपण स्थळावरून 432 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यापैकी 397 एकट्या गेल्या 10 वर्षांत प्रक्षेपित करण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, सरकारने अंतराळ विभागाच्या अंतर्गत इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) सारख्या सरकारी एजन्सी तयार केल्या आहेत, ज्या खाजगी संस्थांना अवकाश क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन, नियमन आणि परवानगी देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.