भारताकडे पुरेसा इंधन साठा – प्रमुख तेल वितरण कंपन्यांकडून दिलासा
मुंबई, दि. 7 : इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइल यांनी पुकारलेल्या भीषण युद्धाला तोंड फुटल्यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आज घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल 60 रुपयांनी वाढ झाली आहे. आता प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढू शकतात या विचाराने सर्वसामान्य नागरिकांना चिंता वाटू लागली आहे. दरम्यान देशातील आघाडीच्या तेल विपणन कंपन्या (OMCs) – IOCL, BPCL आणि HPCL यांनी भारताची स्थिती भक्कम असल्याने काळजी नको असे ठामपणे सांगितले आहे.
तेल कंपन्यांनी अधिकृतपणे दिलेले निवेदन
इंडियन ऑइल (IOCL): कंपनीने स्पष्ट केले की, आमचे वितरण नेटवर्क पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची आवश्यकता नाही, कारण साठा पुरेसा आहे.
भारत पेट्रोलियम (BPCL): होर्मुझच्या समुद्रधुनीतील तणावाचा तात्पुरता परिणाम झाला तरी, भारताकडे कोणत्याही शॉर्ट टर्म संकटाचा सामना करण्यासाठी पुरेसा बॅकअप प्लॅन तयार आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL): केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर घरगुती गॅसचा (LPG) साठाही मुबलक आहे. नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
हॉर्मुझ सामुद्रधुनीचे हा मार्ग जागतिक तेल व्यापाराची ‘जीवनवाहिनी’ मानला जातो. इराण आणि ओमानच्या दरम्यान असलेला हा अरुंद मार्ग भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सरकारने पर्यायी मार्गांनी पुरवठा वाढवण्याची तयारी आधीच केली असल्याने सध्या तरी चिंतेचे काहीही कारण नाही असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.
SL/ML/SL