भारताने फेटाळून लावला अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा

नवी दिल्ली, दि १३: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात कठोर कारवाई केल्यानंतर नरमाईची भूमिका घेत पाकने भारताकडे युद्धबंदीची विनंती केली होती.यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता. भारताने आज हा दावा फेटाळून लावला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. दोन अण्वस्त्र संपन्न राष्ट्रांमधील युद्ध टाळल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला होता. दोन्ही देशांना व्यापार रोखण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी शस्त्रसंधीची तयारी दर्शवली. व्यापार रोखण्याची धमकी दोन्ही देशांमधील संघर्ष रोखण्यात महत्त्वाची ठरली, असं ट्रम्प म्हणाले होते. मात्र त्यांचा दावा भारतानं स्पष्टपणे खोडून काढला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला.