महाराष्ट्रातील १५ सरपंचांना स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत निमंत्रण

नवी दिल्ली, दि. १४ : उद्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील 9 महिला सरपंचांसह एकूण 15 सरपंचांचा समावेश आहे. या सर्व सरपंचांनी आपापल्या गावांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान दिला जात आहे. या सरपंचांनी पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवून गावांचा विकास घडवून आणला आहे.
निवड झालेले सरपंच
सोलापूर: प्रमोद लोंढे (लोंढेवाडी)
नागपूर: जयश्री इंगोले (खासळा नाका)
पुणे: संदीप ढेरंगे (कोरेगाव भीमा)
अकोला: डॉ. अनुप्रिता भांडे (म्हातोडी)
ठाणे: नयना भुसारे (भावसे)
वाशिम: सुनीता मिटकरी (ढोरखेडा)
गडचिरोली: अपर्णा राऊत (कोंढाळा)
अहिल्यानगर: संजीवनी पाटील (खर्डा)
गोंदिया: चंद्रकुमार बहेकार (भेजपार)
भंडारा: रोमिला बिसेन (केसलवाढा)
रत्नागिरी: सूरज चव्हाण (चिंचाळी)
परभणी: पार्वती हरकल (कुंभारी)
सातारा: प्रमोद जगदाळे (बिदल)
अमरावती: शशिकांत मांगले (कसबेगव्हाण)
लातूर: प्रभावती बिराजदार (बामणी)
या सरपंचांनी ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या योजना शंभर टक्के यशस्वी केल्या आहेत. सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा, वृक्षारोपण आणि गावांना ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
SL/ML/SL