नागपुरात काल पासून पावसाची संततधार

नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू असून पेंच तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरणांचे दरवाजे उघडले आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता दिला आहे.
संततधार पावसामुळे अनेक खोलगट भागात पाणी देखील साचलेले आहे. 16 सप्टेंबर २०२३ रोजी करिता Orange Alert दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा आणि वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. संततधार होत असलेल्या पावसामुळे पेंच तोटलाडोह तसेच नवेगाव खैरी धरण पूर्ण १००% भरलेले असून तोटलाडोह धरणाचे १४ पैकी १० दरवाजे ०.४ मी तर नवेगाव खैरी धरणाचे सर्व १६ दरवाजे ०.३ मी ने उघण्यात आलेले असून त्या मधून ५०० पेक्षा जास्त क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच नदीमध्ये सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणातून देखील नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. या अनुषंगाने नदी तसेच धरणा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पेंच, कन्हान, कोलार, नांद नदी तर नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी शेजारी वसलेल्या गावांना , नागरिकांना अधिक काळजी तसेच दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
ML/KA/SL
15 Sept. 2023