मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत असे ते म्हणाले.
एनडीआरएफ तसेच एसडीआरएफ च्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे कामकाज ही लवकर संपविण्यात आले , तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.
ML/KA/SL
19 July 2023