कसोटी सामन्यांबाबत ICC चा मोठी निर्णय

मुंबई, दि. १८ : ICC ने कसोटी क्रिकेट लढती चारदिवसांच्याच खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२७-२९च्या कार्यक्रमात या चारदिवसीय कसोटीचा समावेश करण्यात येणार आहे. सामने एक दिवसाने कमी करण्याचा हा निर्णय एक महत्त्वपूर्ण बदल असेल; कारण लहान राष्ट्रांच्या संघांना अधिक कसोटी सामने आणि मोठ्या मालिका खेळण्यास मदत होणार आहे, असे आयसीसीला वाटते. त्यामुळे आता त्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
आयसीसीने सर्वप्रथम २०१७ मध्ये द्विपक्षीय सामन्यांसाठी चारदिवसीय कसोटींना मंजुरी दिली होती. इंग्लंडने गेल्या महिन्यात ट्रेंटब्रिज येथे झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळला होता. यापूर्वी त्यांनी २०१९ आणि २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध चारदिवसीय कसोटी खेळल्या होत्या.
दरम्यान २०२५-२७ या काळातील कसोटी लढती या पाच दिवसांच्याच होणार आहेत. याची सुरुवात श्रीलंका-बांगलादेश दरम्यानच्या कसोटी मालिकेने होईल. या कार्यकाळात नऊ देशांमध्ये एकूण २७ कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत.